Wednesday, April 29, 2020

बहुआयामी प्रकाश पिटकर यांनी रेखाटलेले व्यक्तिचित्र

Image © Prakash Pitkar...

 

*यमन - हुरहूर - कातरवेळ
नळसरोवर, गुजरात

यमन हा केवळ राग नाही
जगण्याची अनुरागी वृत्ती आहे
मनोमन जपलेल्या अपेक्षांचे
सार्थसे वर्णन आहे ....

ना वय, ना काळ
हा तानपुरा गूंजता असतो
'रंजिश ही सही'
स्वतःलाच सांगत असतो ....

'आज जाने की जिद ना करो'
असं कोणीतरी म्हणावं
हे कोणाला वाटत नसतं ?
मनाला मोकळं जरा सोडायचं असतं ....

'मंद झाल्या तारका'
तरी आणि तरीही मनोमन
'येरी आली पियाबिन'
रंगत असते .....

यमन हा वर्णनाचा विषय नसतो
ते विशेषण, क्रियाविशेषण असते
तानपुऱ्याला तानपुऱ्याने दिलेले
साथीदारासाठीचे रंजन असते ....
- चंद्रशेखर टिळक

गुंतवू म्हणून गुंतत नाही
सोडवू म्हणून सुटत नाही
इतर काय, अगदी स्वतःचेही नाही
मनाचे वागणे मनालाही कळत नाही ....

आयुष्यात कधीही काही
सहजासहजी मिळत नाही
कठीण तेच हवं असतं तरीही
मनाचे वागणे मनाला कळत नाही ...

Monday, April 27, 2020

यश हे प्रयत्नांती असते ..... ( अर्थ आणि परमार्थ ...लेख पाचवा )

परमार्थ समजण्याची माझी कोणत्याही अर्थाने , कोणत्याही प्रमाणात जरासूद्धा कुवत किंवा क्षमता नाही .
गुंतवणूक क्षेत्रात मात्र अद्याप जवळजवळ ३२ वर्षांची नोकरी झाली . 

पण एक आहे या दोन्ही क्षेत्रांविषयी विचार करत असताना मला लोकमान्य टिळक यांच्या एका विधानाची सतत आठवण येते . लोकमान्य टिळक म्हणत असत की ...
" यश हे प्रयत्नांती असते ; वाच्यान्ति नव्हे ."

नाहीतरी ह. भ .प. श्री दासगणू महाराज यानी रचिलेल्या " श्री गजानन विजय " ( लोकप्रिय भाषेत गजानन महाराजांची पोथी ) या पोथीच्या  १५ व्या  अध्यायाच्या एकूण १४१ ओव्यांपैकी ओवी ९ ते १0८ अशा  ९९ ओव्या लोकमान्य टिळक यांच्याविषयीच आहेत ना! 
एखाद्या आध्यात्मिक पोथीत असे आणि इतके स्थान मिळवणारा लोकमान्य टिळक सोडले तर दुसरा कोणताही भारतीय राजकीय नेता नसेल .
असो .

असे क्रुतीशील प्रयत्न न करणाऱ्या मंडळीविषयी ( अर्थातच  पोथीतल्या ओवीला शेअरबाजार जराही अपेक्षित नाही हे उघड आहे .) या पोथीच्या ५ व्या अध्यायातील १0६ व्या श्लोकात एकदम झणझणीत अंजन घालण्यात आले आहे .

Thursday, April 23, 2020

हिरे गारा एक्या ठायी. ( अर्थ- परमार्थ : लेख चौथा)

दासगणू महाराजांनी "श्री गजानन विजय" ही पोथी काही शेअर बाजार किंवा गुंतवणूक क्षेत्र डोळ्यांसमोर ठेवून किंवा डोक्यात ठेवून निश्चितच लिहिलेली नाही ; आणि श्रद्धेय गजानन महाराज यांचाही  दूरान्वयेसुद्धा या क्षेत्राशी संबंध नव्हता हे वेगळेपणाने सांगण्याची जरासूद्धा आवश्यकता नाही .

 पण या पोथीत काही काही ओव्या अशा आहेत की त्या ओव्या शेअरबाजारातल्या वातावरणाची अतिशय वस्तुनिष्ठ चर्चा करत आहेत असेच वाटते .
निदान मला तरी ....
अगदी दरवेळी .

असे वाटण्याची पहिली ठेच पहिल्याच अध्यायाच्या १0७ व्या ओवीत लागते .
ती ओवी अशी .,

" हिरे गारा एक्या ठायी
मिसळल्या असती जगा ठायी
पारखी तो निवडून घेई
गार टाकून हिऱ्या ते ."

आपल्याच अस नव्हे , तर कोणत्याही शेअरबाजारात , कोणत्याही काळात ,ज्या शेअर्सची उलाढाल होत असते ,उलटसुलट चर्चा होत असते त्याचे वर्णन , या ओवीच्या पहिल्या २ ओळीत जे वर्णन केले आहे त्याहून जास्त चपखलपणे करता येणे केवळ अशक्य आहे .

हिरे गारा एक्या ठायी. ( अर्थ- परमार्थ : लेख चौथा)

दासगणू महाराजानी " श्री गजानन विजय " ही पोथी काही शेअरबाजार किंवा गुंतवणूक क्षेत्र डोळ्यांसमोर ठेवून किंवा डोक्यात ठेवून निश्चितच लिहिलेली नाही ; आणि श्रद्धेय गजानन महाराज यांचाही  दूरान्वयेसुद्धा या क्षेत्राशी संबंध नव्हता हे वेगळेपणाने सांगण्याची जरासूद्धा आवश्यकता नाही .

 पण या पोथीत काही काही ओव्या अशा आहेत की त्या ओव्या शेअरबाजारातल्या वातावरणाची अतिशय वस्तुनिष्ठ चर्चा करत आहेत असेच वाटते .
निदान मला तरी ....
अगदी दरवेळी .

असे वाटण्याची पहिली ठेच पहिल्याच अध्यायाच्या १0७ व्या ओवीत लागते .
ती ओवी अशी .,

" हिरे गारा एक्या ठायी
मिसळल्या असती जगा ठायी
पारखी तो निवडून घेई
गार टाकून हिऱ्या ते ."

आपल्याच अस नव्हे , तर कोणत्याही शेअरबाजारात , कोणत्याही काळात ,ज्या शेअर्सची उलाढाल होत असते ,उलटसुलट चर्चा होत असते त्याचे वर्णन , या ओवीच्या पहिल्या २ ओळीत जे वर्णन केले आहे त्याहून जास्त चपखलपणे करता येणे केवळ अशक्य आहे .

Tuesday, April 21, 2020

पुस्तक अभिप्राय

सध्या करोनाच्या लॉक डाऊन मुळे तसा थोडा निवांतपणा आहे .
" Work from Home " आणि " Work for Home " असं दोन्ही जोरात सुरू असले  तरी ....
काल दुपारी झोप येत नव्हती . म्हणून सहजच चाळा म्हणून तुझे एक पुस्तक हातात घेतले ....
आणि ...
खोटे नाही सांगत ...
पण सगळ्या आघाड्यांवर झुंजत असतानाच रात्रभर जागून झपाट्याने तुझी सगळी पुस्तके एकापाठोपाठ एक वाचून काढली .....
घरातले म्हणले ही गंमतीने ...आज माझे अखंड नामस्मरण किंवा पारायण सुरू आहे ....

चक्री पारायण झाले तुझ्या पुस्तकांचे .... 
मल्हार मनाचा ,
मनातलं मनातच ,
केल्याने देशाटन ,
अर्थस्वर ,
जन्मझुला ,
मला भावलेले गुलजार ....

आधी प्रत्येक पुस्तक सलग
आणि मग यातले थोडं - त्यातलं थोडं असं ...
म्हणून चक्री पारायण म्हणल ...

हॆ करताना आणि करून झाल्यावरही मनात एकच भावना आहे ...
ती म्हणजे ....
" ही तुझी ललित स्वरूपाची पुस्तके म्हणजे तू स्वतः स्वतःवरच उगवलेला सूड आहे ....खूप वेळ घेतलास हा सूड ऊगवायला ....पण जेंव्हा सूड ऊगवलास तेंव्हां मात्र अगदी सव्याज ..."

चमकून जाऊ नकोस हॆ वाक्य - अभिप्राय वाचून .. .
आपण दोघही लहानाचे मोठे बरोबर झालो आहोत .
एकत्र शिकलो आहोत ...
त्यातली कित्येक वर्षं एका वर्गात .
त्यामुळे मला चांगले माहीती आहे की तुला मनोमन इंग्लीशचे प्रोफेसर व्हायचे होते .
पण ते होऊ शकला नाहीस .
झाला नाहीस .

त्याऐवजी  तुझी अख्खी करियर आर्थिक क्षेत्राशी निगडीत राहिली ...
तो विषय तुला कधीच आवडला नाही तरीही ...
आवडलाही नाही आणि समजलाही नाही असं तू म्हणतोसही ....
त्याकडे आम्ही सगळेच दुर्लक्ष करतो .
सरावाने ...

पण आज प्रकर्षाने जाणवत आहे की तू ही मधली वर्षं स्वतःला स्वतःशीच गुदमरवून राहात होतास .
आज या पुस्तकातून तू उफाळून आला आहेस ...

पण हॆ " तुझे " उफाळून येणे आहे .
तुझ्या सारखेच ...
तू कडवा होतास , तू कडवट नव्हतास आणि नाहीस .
तू कधीही खुनशी नव्हतास ...असूच शकतच नाहीस .
अगदी तसंच तुझे हॆ उफाळून येणे आहे ....
म्हणून स्वतः स्वतःवरच उगवलेला सूड म्हणजे ही पुस्तके ...
प्रोफेसर होऊ न शकल्याचा स्वतःच स्वतःवरच उगवलेला सूड .

हा सूड कसा आहे हॆ सांगू ?
आपण सगळे मिळून एकदा कसला तरी ड्राफ्ट बनवत होतो ...त्यातला चौकट हा शब्द तुला खटकत होता ...
तेंव्हां तू म्हणालास ...
" चौकट हॆ बंधन आहे . ती नकारात्मकता आणते . इथे फ़्रेम सारखा काहीतरी शब्द हवा ....फ़्रेम सांभाळते आणि सजवते ....तसं काहीतरी "

तुझी ही पुस्तके सूड असली तरी ती फ़्रेम आहेत .
फ़्रेम ....सांभाळणारी आणि सजवणारी ....
तुलाही आणि वाचकानाही ...
प्रत्येकाच्या भूत - वर्तमान आणि भविष्याला सांभाळणारी आणि सजवणारी .

कारण हा सूड ..
सूड .
सूड चांदण्याचा .

Sunday, April 19, 2020

केल्याने देशाटन ... पुस्तक अभिप्राय (२)

सुप्रभात शेखर,

मी तुझं "  केल्याने देशाटन "  हे पुस्तक वाचलं .
 केवळ अप्रतिम!
 काय लिहीतोस रे खुप सुंदर, !

इडली काॅफी व मालक ही कथा वाचतांना ती नुसती वाचत नव्हते तर इतकी रंगून गेले की असं वाटतं की मी पण ते सगळं एंजाॅय करतेय.

 इतकं सुंदर लिहीतोस की आपल्या बरोबर वाचकाला पण त्या ठिकाणी घेऊन जातोस मग तो चहा असो,खारे दाणे, खिचडी, गुड का पराठा किंव्हा कैरी असो .
तसंच त्या कथांबरोबर मी मिझोराम, श्रीनगर, कलकत्ता आणि चंदीगडला पण फेरफटका मारून आले .
खुप एन्जोय केलं. .

तुझ्या लिखाणात तेव्हढी ताकद आहे .
मानलं तुला .
 माझ्याकडे तुझ्या लिखाणाची तारीफ करायला तुझ्यासारखी प्रतिभा नाही .
पण मनापासून सांगते की मला तुझं  लिखाण खुप आवडतं .
 खुप सुंदर लिहीतोस.

 proud of you 👍👍🙏🙏.

सुनीता शिरवळकर मुळे 
डोंबिवली .
१३ एप्रिल 2020 .



-------------------------------------xxx---------------------------------------

" नमस्कार .

आज केल्याने देशाटन चे दुसऱ्यांदा पारायण केले ...

मला ही फिरायला खुप आवडते . पण आधी जग फिरायचे नंतर आपला भारत देश .. तसेही बरेशी ठिकाणे पाहीलेली .

पण या कोरोना ने डोळे खाडकन उघडले . कारण " केल्याने देशाटन "

सर्व परिस्थिति स्थिर झाली की मी
मिझोराम बघणार आहे .
कारण केल्याने देशाटन

आणि सर्व भारत फिरताना आपले पुस्तक मात्र सोबत ठेवणार आहे .
तुम्ही अनुभवलेली सर्व खाद्य पदार्थांची चव चाखणार आहे ...
धन्यवाद कोरोना
केल्याने देशाटन ."


स्वाती मुळे - वाळुंज.
पुणे .
२९ मार्च २०२० 


( हॆ पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे ....अगदी ऑनलाईन सुद्धा ...तसेच मोरया प्रकाशनाच्या वेबसाईट वरही ... तसेच 9820292376 वरही पुस्तक खरेदीसाठी संपर्क करू शकता .)

Saturday, April 18, 2020

अवधान द्यावे लवलाही. ( अर्थ आणि परमार्थ ....भाग तिसरा ) .

या लेखमालेचे भाग लिहीत असताना मला सारखे वाटत आहे की या लेखमालेचे नावच मुळी " अवधान द्यावे लवलाही" असंच ठेवावे .

गजानन महाराज पोथीच्या पहिल्या अध्यायाच्या १४५ व्या ओवीत दासगणू महाराज सांगतात ...

" अवधान द्यावे लवलाहीं
त्या श्रवण करावया ¦¦ "

पोथीत सांगितलेला कथा - सार आणि साहजिकच तत्व - चर्चा जर नीट समजून घ्यायचा असेल तर श्रोत्यांनी ते लक्षपूर्वक ऐकले ( च ) पाहिजे अशी ती विनवणी आहे .
पोथीचे तर फक्त श्रवण - वाचन करायचे आहे तरी लक्षपूर्वक करायचे असेल ; तर शेअरबाजारात , पर्यायाने गुंतवणूक - व्यावसायिक - आर्थिक क्षेत्रात तर प्रत्यक्षात कार्यरत राहायचे असते ( अगदी अपरिहार्यपणे राहवेच लागते ) तर किती एकाग्रता आणि सावधानता बाळगली पाहिजे !

ही ओळ ज्या ज्या वेळी मी वाचतो किंवा मला आठवते त्या त्या वेळी या ओळीतल्या प्रत्येक ( अगदी तिन्ही च्या तिन्ही ) शब्दांचे महत्व जाणवत राहते .
अगदी ठसते च मनात ...

उगाचच नाही आपल्या लहानपणापासून आपल्याला सांगितले जात की कोणत्याही पोथीतला कोणताही शब्द उगाचच , विचार न करता तिथे आलेला नसतो . केवळ  अनुप्रास किंवा यमक जुळवण्यासाठी तर नाहीच नाही ....
आज या पोथीचा एकंदरीतच अर्थकारणाच्या संदर्भात , आणि त्यातही विशेषतः गुंतवणूक क्षेत्राच्या संदर्भात विचार करत असताना पटकन मनात आले की अर्थकारणाचे संस्कार आपल्या समाजात लहानपणापासून का होत नसावे ? 
असो .

आता हेच बघा ना !
ही ओळ कशी आहे ...." अवधान द्यावे लवलाही "
अवधान हा शब्द लक्ष या शब्दापासून केवळ अक्षर - रचना म्हणून वेगळा नाही ; तर अर्थाची छटा आणि प्रव्रुत्ती म्हणूनही  पूर्णपणे वेगळा आहे ..
एखादी गोष्ट आपले लक्ष नसतानाही लक्षात येते . निदान येऊ शकते .
अवधान या शब्दाचे तसे नाही . हा मुद्दा - हा विषय मला समजून घ्यायचाच आहे आणि त्यानुसार तो आचरणात आणायचा आहे या उद्देशाने केलेली एकाग्रता म्हणजे अवधान ...
आणि म्हणून याच्या उलट अर्थाचा शब्द " अनवधानाने " !!!!

म्हणजे " बचत ( savings ) आणि गुंतवणूक ( investment ) यांत जो फरक आहे ...अगदी नेमका तोच फरक " लक्ष " आणि " अवधान " यांत आहे .

आणि साहजिकच , किंवा कदाचितही , म्हणूनच या दोन शब्दांबरोबर घेतली जातात त्या क्रियापदातही फरक आहे ...
आपण " लक्षात घे "  म्हणतो
आणि " अवधान द्या " म्हणतो .
याचाच अर्थ असा आहे की लक्ष हॆ आपसूक किंवा आपोआप होते . असते . होऊ शकते .
अवधान तसे नसते .
"लक्ष "दिलेल्या गोष्टी बाहेरून आत येतात ...आणि त्यासाठी आधीच मानसिक तयारी केलेली असेलच असे नाही .
" अवधान " तसे नसते . त्यात आधी आतून बाहेर येते आणि नंतर बाहेरून आत येते व ही प्रक्रिया सुरूच राहाते .
त्यामुळे एका अर्थाने लक्ष ही सतत चालणारी गोष्ट नाही .
आणि ती प्रक्रियाही नाही .
अवधान मात्र दोन्ही आहे .
असं आहे म्हणूनच तर " अर्थ " आणि " परमार्थ " दोन्हीत लक्ष पेक्षाही अवधान जास्त येणार ना .....! ! ! !

" लवलाही " हा शब्द म्हणजे अमिबा प्राण्यासारखा आहे ....कोणत्याही दिशेने , कितीही वेगाने , कशाही प्रमाणात पसरणारा ... त्यामुळे अशा गोष्टी बाबत सावध च राहिले पाहिजे .
त्यामुळे " अवधान द्यावे लवलाही " असं लिहिताना - सांगताना सावधतेचा इशारा तर देत नाहीत ना असं मला दरवेळी वाटत राहते .
ज्याचे रूप आणि स्वरूप सतत बदलते किंवा बदलू शकते अशा गोष्टी म्हणजे लवलाही.
अशा सतत बदलणाऱ्या गोष्टी काही प्रमाणात आपण रोखू शकतो ; काही प्रमाणात नाही . अशा गोष्टी म्हणजे लवलाही.
अशा बदलण्याचे आणि रोखण्याचेही स्वरूप व प्रमाण दरवेळी बदलत राहते ते लवलाही.
काहीवेळा " पुढच्यास ठेच , मागचा शहाणा " हॆ लागू पडते ; तर बहुतेकवेळा " Past performance is not the guarantee for the future " असं असते ते लवलाही...
( Future कसले घेऊन बसलात ?  इथे present ची सुद्धा खात्री देत नाही - देणार नाही असं असते ते लवलाही )

एकंदरीतच अर्थ काय आणि परमार्थ काय ....
यातले काहीही , अगदी दोन्हीही , करताना जाणीवपूर्वक केले पाहिजे . आणि मानसिक - भावनिक - -बौद्धिक - शारीरिक पूर्वतयारी करून केले पाहिजे असं दासगणू महाराज सुचवत राहतात .
ही ओळ पोथीत कुठे येते पाहा ना ?
पहिल्या अध्यायाच्या शेवट शेवटच्या ओळीत ...पोथीचा चन्चुप्रवेश तर झाला आहे ..आता पुढे जायचे असेल तर आपल्या बाजूने एक गोष्ट अत्यावश्यक ...
ती म्हणजे ..." अवधान द्यावे लवलाही "

ही ओळ म्हणजे भांडवल - बाजाराची  आपल्या देशाचे नियंत्रक ( रेग्युलेटर ) संस्था सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ( सेबी ) आग्रह धरते असा " डिस्क्लेमर क्लॉज " ! ! !

अवधान द्यावे लवलाहीं .....





९ एप्रिल २०२० .

Friday, April 17, 2020

लेखणी काढी अक्षर ( अर्थ आणि परमार्थ ....भाग दुसरा .)

आपल्या देशाच्या शेअरबाजाराविषयी विचार करायला लागले ना की मला  गजानन महाराजांच्या पोथीच्या पहिल्याच अध्यायात " लेखणी " चे जे वर्णन केले आहे ना तेच आठवायला लागते .
त्या अध्यायात नाही का म्हणले आहे ....
" लेखणी काढी अक्षर
परी तिच्यात नाही तो जोर
ती निमित्ताकारण साचार
लेखनरुपी कार्याला .¦¦"
( पहिला अध्याय , ३१ वी ओवी )

मला हॆ पूर्ण माहीती आहे आणि पक्के लक्षात आहे की या अर्थाने ही ओवी पोथीत लिहिलेली नाही .
त्याबाबत कोणाच्याही , कसल्याही , कोणत्याही भावना दुखावण्याचाही  माझा जरासुद्धा उद्देश नाही .

Thursday, April 16, 2020

अमृतांजन ...

मुंबई - पुणे महामार्गावरील १९० वर्षं जुना पण तरीही अजूनही भरभक्कम असलेला ( आणि तरीही की म्हणूनच उपयोगात नसलेला ) अमृतांजन पूल ४ एप्रिल २०२० रोजी पाडण्यात आला .ही बातमी आपण सगळ्यांनी त्यादिवशी आणि नंतरही अनेक चित्रवाहिन्यांवर पाहिली ...

ती पाहात असताना आणि तेंव्हापासून मनामधे अनेक विचार येत होते . असे विचार शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न .

ही बातमी देताना एका वाहीनीवर " पाडकाम " असा शब्दप्रयोग करण्यात येत होता . आपल्या मराठीत असा काही शब्द आहे हॆ निदान मला तरी माहीती नव्हते . असा शब्द आपल्या मराठीत  असल्यास मी माझ्या नसलेल्या अकले बद्दल मनापासून माफी मागतो .

दुसरा विचार म्हणजे , खरं तर या पूलाचा आणि अमृतांजन कंपनीचा तसा काहीही संबंध नाही . ना या कंपनीच्या मागणी वरून त्यावेळी हा पूल बांधण्यात आला होता , ना या कंपनीने त्या पूलासाठी आलेला खर्च प्रायोजित  होता . या कंपनीकडे या पूलाची टोल - वसूलीही असल्याचेही काही ऐकिवात नाही .( पुन्हा माझे अद्न्यान...आणि माफीही ). कारण मुळातच त्यावेळी असा काही आक्रुतीबंध ( Pattern अशा अर्थाने ) सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात अस्तित्वातच नव्हता .


Tuesday, April 14, 2020

बहुरुप्याचे राजेपण . ( अर्थ आणि परमार्थ ....भाग पहिला .)

आज सकाळीच एका वर्गमित्राचा मेसेज आला ...." अरे , आज आपला शेअर बाजार वर आहे ...कालही होता."
त्याच्या विचारण्याचा अर्थ असा होतात की तू तर म्हणत होतास की सध्या शेअरबाजार हॆ क्षेत्र वादळी आहे .म्हणजे तुला काय आणि किती कळत हॆ कळले .
अगदी कळून चुकले .

काय आणि कसं माहीती नाही . पण त्याला उत्तर देताना मी म्हणून गेलो ..." हॆ बहुरुप्याचे राजेपण न ठरो हीच सदिच्छा ."

मी त्याला हॆ उत्तर तर दिले .
पण मग लक्षात आले की ह .भ .प . श्री दासगणू महाराज रचित " श्री गजानन विजय " या पोथीच्या ( लोकप्रिय भाषेत सांगायचे तर गजानन महाराज पोथीच्या ) दहाव्या अध्यायात ही १६१वी  ओवी आहे .

ती ओवी अशी आहे ....
" बहुरुप्याचे राजेपण
कोठून टिके बाजारी "

अर्थातच ही ओवी लिहिताना काही शेअरबाजार कोणाला अभिप्रेत नव्हता हॆ अत्यंत उघड आहे . त्यामुळे असं उत्तर मी दिल्यामुळे अतिशय अपराधी वाटायला लागले.
 शेअरबाजारात पहिल्यांदा गुंतवणूक करताना अनेकांना वाटते तसे ....
एकदा सरावले की काही अपराधी वाटत नाही .
चटावतात एकदम ....
म्हणजे हॆ अपराधीपण एक वेगळ्या (च ) तर्हेचे " बहुरुप्याचे राजेपण " ...

हॆ अपराधीपण ताजे असतानाच असं जाणावयला लागले की गजानन महाराजांना आणि अगदी दासगणू महाराजांनाही जरी ते अभिप्रेत नसले तरी या पोथीमधल्या अनेक ओव्या शेअर - बाजाराच्या संदर्भात एकदम चपखलपणे लागू पडतात .

....असाच प्रयत्न करणारी ही लेखमाला .