Sunday, June 21, 2020

" चाल " बाज चीन.


गेले काही दिवस आपला देश आणि चीन यांच्या सीमारेषेवर सुरू असलेल्या घटना चर्चेत आहेत. ही अशी चर्चा होणे हे स्वाभाविकच आहे. 

पण केवळ इतकीच त्याची स्वाभाविक सहजता असावी कींवा असेल?
आपले तीन आणि वीस ; आणि त्यांचे त्रेचाळीस एवढ्या पुरेसे ते मर्यादीत असेल कींवा आहे ? 
1967 नंतर पहिल्यांदाच या सीमारेषेवर सैनिकांची जीवीतहानी झाली हे त्याचे एकमेव वैशिष्ट्य असेल कींवा आहे ?
1967 ते 2020 या 53 वर्षांच्या काळात भारतीय व चीनी लष्कर एकमेकांच्या समोरासमोर आल्यावर फक्त शारीरिक रेटारेटी असं त्यांचं स्वरूप मर्यादीत असताना आता अचानक- एकदम लाकडी सोटे आणि तेही अणुकुचीदार वायरी गुंडाळलेले  कुठून आले? 
स्थानिक चीनी लष्करी आधीकाऱ्याने  स्वतःचे डोके वापरून स्वतःच्या आधिकारात उपयोगात आणण्या इतपत स्वातंत्र्य  अशा संवेदनशील सीमारेषेवरच्या स्थानिक  लष्करी आधिका ऱ्याला , आणि तेही चीनी आधिकाऱ्याला असते कींवा असेल ?

साहजिकच या सगळ्या प्रश्नांची  उत्तरे नकारार्थी आहेत.
असं असेल आणि आहे तर प्रश्न हा आहे की  आत्ताच असं काय झाले की त्रेपन्न वर्षात जे झाले नाही ते आज व्हावे ?
"कोरोना ( कोवीद 19 )  आणि त्यानंतर..."  हे त्याचे ढोबळ कारण असले तरी ज्याला आपण Last Straw on Camel' s back म्हणतो  असं गेल्या काही दिवसांत काय झाले ? 
कारण कोरोना हे कितिही काळ-काम- वेगाचे गणित असले तरी ते एका अर्थाने  चार- पांच महिने जुने झालेले गणित आहे.

असा विचार करत असताना जाणवलेल्या या काही गोष्टी....

याबाबत मला जाणवणारी सगळ्यात पहिली आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी अलीकडेच आपल्या देशाच्या परकीय चलनांच्या साठ्याने ( फॉरेक्स रिझर्व्ह) गाठलेली  500 बिलियन डॉलर्स ची पातळी. 
स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातली हीं सर्वात जास्त अशी विक्रमी पातळी आहे. 
( या पातळीची कारणमीमांसा आणि संभाव्य परिणाम याची सविस्तर चर्चा माझ्या यु ट्यूब चेनेल वर कालच म्हणजे 19 जून 2020 रोजी लोड केलेल्या विडिओ मधे मी केली आहे. त्याची लींक...YouTube Link (click to see) .

तसं पाहायचं तर आपल्या देशाच्या अशा अभूतपूर्व विक्रमी पातळीवर पोचलेल्या परकीय चलनांच्या साठ्याच्या कित्येक हजार पट मोठा असा परकीय चलनांचा साठा चीनकडे आहे. आणि तसा तो गेले कित्येक वर्षं आहे. आणि कोरोनानंतरच्या अर्थकारणातही त्यात फारसा फरक पडलेला नाही. निदान फार मोठा फरक तरी नक्कीच पडलेला नाहीच नाही.
असं असूनही चीनने असें लष्करी द्रुष्टीने आक्रमक का व्हावे हे समजून घेणे आवश्यक आहे. चीनच्या द्रुष्टीने  भारताच्या  परकीय चलनांच्या साठय़ात होणारी वाढ ही " म्हातारी मेल्याचे दुःख नाही; काळ सोकावतो आहे " अशा स्वरूपाची आहे. 
निदान असावी. 



" चाल " बाज चीन चा हा पहिला अर्थ....
एकीकडे कोरोनाने जागतिक अर्थकारणाचे कंबरडे मोडले आहे असे जगभरातले अनेक देश स्वतःचे गार्हाणे वेशीवर मांडत सांगत आहेत... अगदी Claiming from the Roof Top असं! अनेक जागतिक वित्तसंस्था  आणि पतमापन संस्था ( क्रेडिट रेटिंग  एजन्सी) सध्या सुरू असलेल्या आणि पुढच्या आर्थिक वर्षात अनेक देशांचे राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न (जीडीपी ) वाढणे तर सोडूनच द्या; कमी झालेले असेल असे वारंवार सांगत आहेत. 
" गावंढ्या गावात गाढवी सवाशीण " सारखे त्यातल्या त्यात  चीनचे राष्ट्रीय उत्पन्न या काळात  मर्यादीत का होईना पण सकारात्मक वाढ दाखवेल असा अंदाज या संस्थांनी वर्तवला आहे. त्याखालोखाल जर कोणाची स्थिती त्यातल्या त्यात जगभरात  बरी असेल तर ती  आपल्या देशाची आहे कींवा असेल असे याच वित्तसंस्था सांगत आहेत... ( " गिरे तो भी टांग ऊपर "ची सकारात्मक स्थिती)!
अशावेळी जगभरातले अनेक देश आर्थिक द्रुष्टीने अक्षरशः देशोधडीला लागत असताना आपल्या देशाचा परकीय चलनांच्या साठ्यांची पातळी विक्रमी टप्पा गाठणे हे चीनला अनेक कारणांनी डाचत असणं हे स्वाभाविक आहे. ही गाडी " डिरेल " करण्याची चाल म्हणून या घटना सीमारेषेवर घडत असाव्यात.

Friday, June 19, 2020

न्याय

 तुझी आर डॉक्युमेंट या पुस्तकावरची फ़ेसबुक पोस्ट वाचली.
त्यावरच्या कॉमेंट्स वाचल्या.
किति वेळा माहीती नाही...

तू त्यात लिहिलेले लक्षात आहेच...
पण न लिहिलेले जास्त लक्षात आले आहे.
का लिहिले नाहीस हे विचारणार नाही.
कारण ते आणि तसं न लिहिण्याचे कारण माहीती आहे.
अगदी पूर्णपणे...

कारण आयर्विँग वालेसचे " आर डॉक्युमेंट "  हे पुस्तक म्हणून तर अप्रतिम आहेच...
पण त्याहीपेक्षा...
त्यातला एक संवाद आपल्या सहजीवनाचा मस्त पासवर्ड आहे.
पासवर्ड हा मनोमनीच्या एकांताचा सांगाती आहे तूच म्हणतोस ना....

तुला माहीती आहे...
हे मलाही माहीती आहे...
त्या पुस्तकात एक संवाद आहे .....
" Does Justice have its day in a court ? "
" Justice has its day. Will have it." 
( " न्याय मिळेल का ? मिळतो का ?"
" नक्की मिळेल. नक्की मिळतो ." )

पोस्ट वाचल्यापासून सगळं आठवतंय सतत...
अगदी पहिल्यापासूनच...

आपलं बारावीचे वर्षं नुकतेच सुरू झाले होते....
त्याआधीची दोन वर्षं आपल्या विद्यार्थी संघटनेतर्फे दुष्काळी कामांचा सर्व्हे केला होता. तू त्या टीमचा भाग होतास.. त्या सर्व्हे चा अहवाल प्रसिद्ध करण्याचा जाहीर कार्यक्रम होता...
त्यात तू दुष्काळी कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहारां बाबतची माहीती देताना अनेक गंभीर उदाहरणे सांगत होतास...
आणि तुझ्या विवेचनाचा शेवट करताना आयर्विँग वालेसच्या " आर डॉक्युमेंट " या पुस्तकातला हा संवाद म्हणाला होतास.
सारेच अवाक झाले होते...
विवेचनानेही...
आणि अशा अनपेक्षित समारोपानेही...
अनपेक्षित दोन कारणांनी...
अशा विषयाचा शेवट असा करता येईल हे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हते...
आणि
त्यावेळी या पुस्तकावर अघोषित बंदी होती म्हणूनही....

त्या कार्यक्रमानंतर तुझं अभिनंदन करताना मी पहिल्यांदा तुझा हात...
बराच वेळ...

नंतर आपण एकमेकांना या ना त्या कारणांनी भेटत होतो.
परस्परांना आवडायला लागलो होतो.
ते दोघांनाही मनोमन कळले होते..
पण कोणी कोणाला..
यांत ग्रज्यूएशन पूर्ण होऊन आपण नोकरी सांभाळत लॉ करत होतो...
भावना आणखीन स्पष्ट..
पण शब्दांत येत नव्हत्या...
मी विचारणार नाही हे माझं मला स्पष्ट होते.
स्त्री- सुलभ लज्जा वगैरे काही नाही...
पण तू विचारणे ही मला माझ्या व्यक्तिमत्वाला दाद वाटत होती... म्हणून ते हवे होते...
तुला चिडवण्यासाठी मी ...
मग मात्र तू मला सरळ...

त्यावेळी तुझे शब्द होते....
" Does Justice have its day in court ? " 
साहजिकच उत्तर होते...
" Justice has its day " .

नंतर किति वेळा यावरून आपण एकमेकाना बिलगलो...
आणि म्हणून तू या लेखात हा उल्लेख केला नाहीस ना....
विसरलो सांगू नकोस....
कारण आयर्विँग वालेसच्या याच पुस्तकातल्या याच प्रसंगात एक वाक्य आहे...
" Why do sons assume their fathers know nothing or have forgotton everything ? " 

मैत्रीण ते प्रेयसी ते पत्नी या आजपर्यंतच्या प्रवासात या पुस्तकाच्या केलेल्या प्रत्येक पारायणात तू प्रत्येकवेळी सांगितले आहेस मला...
" Just replace the words Sons and Fathers with the word  Lovers " 
कारण दरवेळी हे सांगतानाची क्रुती आणि आवेग यांत स्थल-काल परत्वे बदल झाला असेल; शब्द आणि भावना नाही...

मी न विचारण्याची आणि तू सांगावे म्हणून केलेल्या खडूसपणाची किंमत न चुकता, अगदी प्रत्येकवेळी, कोणी वसूल केली आहे रे...
त्याचंही समर्थन पुन्हा.... " न्याय मिळतो; न्याय मिळेल. ".
बरोबर ना माय लव्ह ऑफ लाईफ...

एका वेगळ्या अर्थाने मी विचारते...
Does Justice have its day in court ? " 
आणि मीच उत्तर देते... Justice has its day...
कारण...
तू सांगणार... " ,कोर्ट आणि कोरटिंग... " 

न्याय मिळतो.
न्याय मिळेल.







16 जून 2020.

Wednesday, June 10, 2020

आर डॉक्युमेंट.

नुकतेच दहावी ssc पास झालोय असं माझं वय आणि अक्कल.... केवळ शारीरिकच नव्हे तर बौद्धिक , सामाजिक, राजकीय समज सगळेच पौगंडावस्थेत अशी स्थिती.... 
समज अगदी कमी ( खरं म्हणजे नाहीच) ; पण कुतूहल कमालीचे अशी माझी वाचक म्हणून ( आणि व्यक्ती म्हणूनही ) अवस्था. 

त्यात बाहेर पराकोटीचे तापलेले आणीबाणीच्या काळाचे वातावरण.... सन 1975 - 1976 चा काळ.
देशभरात घटना- दुरुस्तीची गरमागरम चर्चा...
कळत तर काही नव्हते... पण आपले गटनेते सांगतात त्यावर भाबडा विश्वास ठेवत त्याची पोपटपंची करण्याचं ते वय.... शारीरिकही आणि मानसिक ही!!!

अशा अवस्थेत 1975 साली पहिल्यांदा वाचलेले पुस्तक म्हणजे आयर्विँग वालेस ( Irwing Wallace ) चे " आर डॉक्युमेंट " 
आयर्विँग वालेस काही थोर लेखक आहे की नाही ह्याची काहीच माहीती त्यावेळी नव्हती.. खरं तर हे नावच माहीती नव्हते.
पण त्यावेळी या पुस्तकावर आपल्या देशात या पुस्तकावर बंदी होती म्हणे!!!
माझ्यासारख्याला सहजपणे ते पुस्तक त्यावेळी मिळाले म्हणजे बंदी कशी असा प्रश्नही पडला नाही ....
बंदी आहे तरी आपण वाचतोय  याचेच तेंव्हा " थ्रील "....

तेंव्हापासून आजपर्यंत कितीवेळा हे पुस्तक वाचले याला गणतीच नाही...

आयर्विँग वालेस.
व्यावसायिक यशाची समीकरणे पक्की घोटलेला लेखक...
वाचकाची पौगंडावस्था त्याच्या वयावर अवलंबून नसून व्रुत्तीवर अवलंबून असते आणि तिचा अस्तित्व-काल ( shelf life हो) दीर्घ असतो या व्यावसायिक सूत्रांचा राखणदार असा लेखक म्हणजे आयर्विँग वालेस.
साधारणपणे दीर्घकथा म्हणावं इतके लहान नाही आणि कादंबरी म्हणावं तर लिओ टॉलस्टॉय सारखे आकार- आशय- कालखंड - अभिव्यक्ती या निकषांवर इतका मोठा  नाही अशा धाटणीची रचना करणारा लेखक....

 अगदीच एकांकिका नाही; आणि  पार पाच अंकी साग्रसंगीत ( आणी तेही अनेकदा Once More घेईल ) असंही नाही तर दोन- अडीच अंकी नाटकाचा सुटसुटीत पसारा आणि मोजक्या नेपथ्यात आणि नटसंचात  नाटक उभारणारा हुकुमी लेखक म्हणजे आयर्विँग वालेस.

पण एकदा त्याचे पुस्तक हातात घेतले की तुमच्या नकळत तुम्ही ते सलग वाचता... यांत पुस्तकाचा छोटेखानी आकार महत्वाचा ठरतो की चटकदार मांडणी हे त्या त्या वेळी तुमचं तुम्ही ठरवायचं.
आणि हे वारंवार होते हे मात्र निश्चितच . 
( हे तुमच्या कशाचं लक्षण....) 

" आर डॉक्युमेंट " या पुस्तकाचा विषय आहे तो अमेरिकी राज्यघटनेत करायची सुधारणा...
खरी की काल्पनिक हे पुन्हा वाचकाने ठरवायचं.
या कादंबरीतल्या या  घटना- दुरुस्तीनुसार मध्यवर्ती सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वाढीव आधिकार देण्यात येणार असतात. अगदी राज्य सरकारांना डावलून. वेळप्रसंगी त्यांचा विरोध असला तरी. आता राज्य सरकारांची ही स्थिती ; तर  सर्वसामान्य नागरिकाला कोण विचारतो ? 
या  सद्रुष्य की तथाकथित साधर्म्यामुळे या पुस्तकावर  तेंव्हा आपल्या देशात बंदी असल्याची फुकाची चर्चा ! 

हे पुस्तक पहिल्यांदा वाचल्यापासून आजतागायत या पुस्तकातला माझा अत्यंत आवडता प्रसंग म्हणजे पेशाने पत्रकार आणि आपद्धर्म म्हणून " घोस्ट रायटर " असणारा इस्माईल यंग अमेरिकी सरकार मधे अटर्नि जनरल असणारया ख्रिस कॉलिन्सला विचारतो की
"  या प्रस्तावित घटना- दूरूस्तीला काहीजणांचा विरोध आहे आणि दिवसेंदिवस तो विरोध हळूहळू का होईना पण वाढतो आहे . हे तुम्हांला माहीती आहे. एक व्यक्ती म्हणून तुम्हांला ही घटना- दुरुस्ती खरंच चांगली वाटते ? " 
त्यावर पुस्तकातल्या त्या प्रसंगात त्या  अटर्नी जनरलने दिलेले उत्तर मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरणार नाही...
तो सांगतो..
" कोणताही कायदा किंवा कायदे- दुरुस्ती ही चांगलीच असते. पण सरकार चांगले असले आणि त्याने ती तरतूद चांगुलपणाने उपयोगात आणली तर  तो कायदा चांगला वाटतो. असं झालं  नाही तर तोच कायदा वाईट वाटतो. " 
याचे कंगोरे सतत जाणवत राहतात.... तात्कालीक उदाहरणे  स्थिती सापेक्ष असतील  ; पण ही जाणीव  नाही ना ! 
आणि काळाच्या ओघात  असे अनुभव....
आपण वाचक म्हणून मग आपण त्या वाक्याशी इतिहास आणि वर्तमान जोडत राहातो....
याच्या आणि इतरही इंग्लिश कादंबऱ्यात उल्लेख आल्याप्रमाणे तुमच्या मनातली व्यक्ती तुमच्या पांघरूणात आली नाही तरी  आयर्विँग वालेस लेखक म्हणून तुमच्या डोक्यात वर्तमानकालीन संदर्भ निवांतपणे सोडतो... 
त्या पुस्तकात ते नसताना...
असं करण्याइतपत आयर्विँग वालेस नक्की सक्षम आहे.... म्हणून तर त्याचे तेच तेच पुस्तक परत परत वाचलं जाते.... ते त्याचे " आर डॉक्युमेंट " ,असू दे नाहीतर  " ,दि सेकंड लेडी " ! 

या पुस्तकातल्या याच प्रसंगात इश्माइल यंग ख्रिस कॉलिन्स ( अटर्नी जनरल)ला विचारतो की असे आधिकार मध्यवर्ती सरकार कडे घ्यावेत असं का वाटते ? त्यावर वाढती गुन्हेगारी असं उत्तर मिळते. या उत्तरावर हा पत्रकार अटर्नी जनरलला पुढे विचारतो की 
" असे गुन्हे हौस कींवा पेशा म्हणून झाले आहेत असं सरकार ला वाटते का  ? असा पेशा व्हावा इतकी जर परिस्थिती आली असेल तर ती एका रात्रीत आली का ? जर वाढती गुन्हेगारी हा बेरोजगारी आणि दारिद्र्य ( Poverty ) यांचा परिणाम असला तर  या घटना- दुरुस्तीने त्यावर उत्तर  मिळेल का ? " 
अटर्नी जनरल ख्रिस कॉलिन्स उत्तर द्यायच्या आधीच पत्रकार इश्माइल यंग पुढे म्हणतो.... " उपाययोजना दारिद्र्यावर हवी; गुन्हेगारी त्यातून कमी होइल. " 

हा प्रसंग आणि त्या निमित्ताने हे पुस्तक कायमचे मनात घर करून राहिले आहे. त्याची कारणे अनेक आहेत. एक तर ज्यावेळी हे पुस्तक मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा ( 1975- 76 )  आपल्या देशाच्या राजकीय- सामाजिक वातावरणात " गरिबी हटाव " ,ची घोषणा जोरात होती. त्याशिवाय त्या दोन- अडीच वर्षात राज्यभर सुरू असलेल्या दुष्काळी कामांच्या पाहणीच्या एका प्रकल्पांतर्गत मी खूपच फिरलो. त्यातून "रोजगारी कींवा बेरोजगारी ही चल ( Variable , Portable आणि Transferable अशा तिन्हीं अर्थाने ) आहे ; तुलनेने गरिबी स्थिर आहे "  हे शिकत होतो. 
त्यावेळी ही शब्दरचना सुचली नव्हतीच.
पण मनोमन हे कुठेतरी रूजत होते. खांद्यावरच्या छोट्या पिशवीत हे पुस्तक होतंच. दोन पाड्यामधलं अंतर पायी पार करताना दमलो म्हणून थांबले की पाण्याच्या घोटाऐवजी याची दोन पाने वाचली जात होती. 
आणि असं वाचन आणि भटकंती सांगत होती...
" गरिबी संपत्तीची आणि ऐपतीची असते ; दानतीची नाही. " 
त्या भाबड्या वयात तरी असं वाटायचं.
पण ते खोटं नाही हे नंतरच्या आयुष्यातलं  आजतागायत सुरू असलेले फिरणं शिकवत राहिले.

त्यामुळे या इश्माइल यंगचा हा प्रश्न कधीच डोक्यातून जात नाही... आणि म्हणून हे पुस्तक ही!

या पुस्तकाच्या पूर्वार्धात असं बरंच काही हा पत्रकार इश्माइल यंग अटर्नी जनरल ख्रिस कॉलिन्स ला विचारत राहतो. ख्रिसची पत्नीही सूचकतेने सुचवत राहते. त्यातून अटर्नी जनरल आधी विचार आणि मग क्रूती करायला लागतो. आणि त्यातून ही प्रस्तावित घटना- दुरुस्ती संमत होत नाही असं 1970 साली पहिली आव्रूत्ती प्रसिद्ध झालेले हे पुस्तक कादंबरी म्हणून वाचकांना सांगते.

नंतरच्या काळात अरुण साधू यांच्या " मुंबई दिनांक " आणि  " ,सिंहासन "'ही पुस्तके वाचताना मला हे पुस्तक सारखे आठवायचं. त्यामुळे मधल्या अनेक वर्षात ही तिन्हीं पुस्तके मी एकाचवेळी आलटून- पालटून  वाचली आहेत.
त्यामुळे असेल कदाचित पण " सिंहासन " ,सिनेमातील पत्रकार ( निळू फूले झिंदाबाद) पाहाताना मला हा इश्माइल यंग जाम आठवत राहायचा ! 
नंतरच्या काळातला संदर्भ म्हणजे अजय झणकर यांचे " ,सरकारनामा " हे पुस्तक आणि त्यावर आधारीत आलेला सिनेमा.
असा हा आठवला की पुन्हा हे पुस्तक वाचायचे... अशी पारायणे!!!

या पुस्तकाचा अजून एक संदर्भ म्हणजे किरण ठेंगडी यांचा " वजीर " हा सिनेमा... विक्रम गोखले यांचा पॉज आणि रोखलेली नजर याच्या इतकेच या बुद्धिबळ पटावरच वैचारिक- शारीरिक- कायदेशीर आणि बेकायदेशीर ही रणांगण म्हणजे हा सिनेमा आणि हे पुस्तक.

असाच या पुस्तकाची पुन्हा पुन्हा आठवण आणि पर्यायाने वाचन यासाठी उद्युक्त करणारा संदर्भ म्हणजे 1988 साली आलेला शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांचा " न्यू दिल्ली टाइम्स " या इंग्लिश नावाचा हिंदी सिनेमा ! 
या सिनेमात  शशी कपूर एका प्रसंगात त्याच्या पत्नीची भूमिका बजावणार्या शर्मिला टागोर ला सांगतो.... 
" बेकायदेशीर आणि कायद्याची सीमारेषेवरचे यातलं  अंतर नेहमीच धूसर असते .  पण आपण करत आहोत ते यातलं काय हे क्रुतीचा परिणाम ठरवतो  ; क्रुतीचा काळ नाही. आणि क्रूती करत असलेली व्यक्ती तर नाहीच नाही. " 
अशा अनेक उत्कंठावर्धक प्रसंगांची  मालीका म्हणजे आयर्विँग वालेसचे " आर डॉक्युमेंट " हे पुस्तक.

1976 च्या सुमारास एक चर्चा अशीही होती की गुलजार साहेब या पुस्तकावर हिंदी सिनेमा काढणार आहेत... संजीवकुमार , शशी कपूर , प्राण  , शर्मिला टागोर अशी मंडळी त्यात असणार वगैरे... पण " ,आँधी " सिनेमाच्या वेळी आलेला अनुभव लक्षात घेऊन हा सिनेमा आला नाही अशीही चर्चा !!!

अगदी पहिल्यांदा आयर्विँग वालेसचे " ,आर डॉक्युमेंट " ,हे पुस्तक वयाच्या 15 - 16 व्या वर्षी वाचताना पटकन लक्षात आलेली ( अगदी पहिल्या 10 पानांतच ) गोष्ट म्हणजे दुसरया लेखकांचा नावनिशीवार उल्लेख करत त्यांची विधाने पुस्तकांतल्या संवादात केलेला उपयोग. हा प्रकार  आयर्विँग वालेसच्या इतरही पुस्तकांत आहे. तसा काही प्रमाणात तो इतरही पाश्चिमात्य कादंबरीकारांबाबत ( उदाहरणार्थ जेफ्री आर्चर) आहे. भले अशी अवतरणे निवडक साहित्यिक ( उदाहरणार्थ ...जॉर्ज बर्नोर्ड शॉ , मार्क ट्वेन , बेंजामीन फ्रँकलीन) मंडळीची असतील. पण आहेत.
दरवेळी हे पुस्तक वाचताना मला फार वाटतं की आपल्या समाजकारण- राजकारणात  आपण दुसऱ्याच्या विधानाची दखल फक्त टिका करण्या साठी कींवा खिल्ली उडवण्यासाठीच करतो का?  त्यातून झिरपत जाणारी असंवेदनशीलता ही दीर्घकालात अनेक आगामी अडचणींची आमंत्रण- पत्रिका ठरते का ?
इतका मोठा आवाका या पुस्तकाचा कदाचित नसेलही... पण संवेदनशील वाचकाला उद्युक्त करत राहते इतके नक्कीच!

या पुस्तकाची जी आव्रूत्ती माझ्याकडे आहे त्यात अगदी सुरवातीला एक प्रसंग दिला आहे....
1787 साली फिलाडेल्फिया नी अमेरिकी राज्यघटनेवर स्वाक्षरी केल्यावर एका महिला डेलेगेट ने बेंजामीन फ्रँकलीन ना विचारले...
" Well , Doctor , what have we  got , a republic or a monarchy?  " 
त्यावर बेंजामीन फ्रँकलीन ने हसून उत्तर दिले,.
" A republic, if you can keep it " 
आणि उत्तर देताना बेंजामीन फ्रँकलीन पुढे म्हणाले...
" Those who would give up essential liberty to purchase a little temporary safety deserve neither liberty nor safety " .
मी हे पुस्तक वाचताना मला दरवेळी या ऊत्तरातल्या एका शब्दावर नेहमीच अडखळत पडायला होते.... " A republic, if you can keep it. " 
या उत्तरात शब्दप्रयोग  YOU असा आहे; WE असा नाही.
आता हे YOU म्हणजे....

हे उत्तर कोरोना नंतरच्या काळात.....

असं हे  आयर्विँग वालेस चे " आर डॉक्युमेंट " 
( त्याच्या " दी सेकंड लेडी " पुस्तका बद्दल नंतर कधीतरी.....) 







10 जून 2020.

Monday, June 8, 2020

Anne Frank पुन्हा - पुन्हा . . . . . . .

(१२ जून १९२९ ही तिची जन्मतारिख .  तिच्या स्म्रुती निमित्त ). 

आपण एखाद पुस्तक कधी वाचतो याचा ते पुस्तक आवडण्याशी काही संबंध असतो का  ?
पुस्तकाचा लेखक किंवा प्रमुख पात्र आणि वाचकांचे वय साधारणपणे एकच असेल तर त्या पुस्तकातील अनुभवांविषयी जास्तच जिव्हाळा वाटतो का  ? 
त्यातही पुस्तकातील राजकीय - सामाजिक परिस्थितिशी साधर्म्य असणारी परिस्थिति ते पुस्तक वाचताना काही प्रमाणात तरी प्रत्यक्षात पाहायला मिळत असेल तर अशा पुस्तकाशी लगेचच आणी जास्तच जवळीक साधली जाते का  ?

 या तिन्ही प्रश्नाचं उत्तर कदाचित नकारार्थी असेलही ; पण  "  The Diary of Young Girl "  हे Ann Frank  चे पुस्तक पहिल्यांदा वाचत असताना माझे मात्र असे झाले होते . १३ -  १५ वर्षांच्या मुलीचे अनुभव १५ - १६ व्या वर्षी वाचताना जास्त भिडतात .  त्यातच त्यावेळी आपल्या देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेली आणीबाणी ऐन भरात होती . त्या वातावरणात Ann Frank चे हे पुस्तक आणि Irwing  Wallace चे  "  R Document  "  सारख पुस्तक यातले प्रत्ययकारी वर्णने भयचकित करायची ! 

या परिस्थितीत नंतरच्या काळात जरूर बदल झाले. पण या पुस्तकाने घातलेल्या मोहिनीत मात्र कधीच काहीच बदल झालेला नाही . " एका तरूण मुलीने लिहिलेली डायरी "  असे नाव असलेले हे पुस्तक नाझी दहशतवादाचे अत्यंत बोलके चित्र उभे करते . १४ जून  १९४२ रोजी या डायरीतली पहिली नोंद आहे . १ ऑगस्ट  १९४४ रोजी डायरीतली शेवटची नोंद आहे .  Ann  च्या  १३व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या वडिलांनी तिला ही डायरी भेंट दिली होती. साऱ्या पुस्तकभर या डायरी चा उल्लेख Ann ने सतत  " Kiti "  असा केला आहे . त्यात अगदी काटेकोरपणाने रोजच्या रोज, न चुकता नोंदी केल्या आहेत अशातला काही भाग नाही. तिच वय, नंतरची परिस्थिति बघता ते साहजिकच आहे. पण त्यात Ann ने व्यक्त केलेले विचार, भावना, अनुभव अतिशय सुन्न करून टाकतात .

फ्रँकफटच्या एका उत्साही, ज्यू उद्योजकाची ( Oto Frank ) गंभीर आणि विचारी अशी ही कन्या. हिटलरचा जर्मनीमधे उदय झाल्यानंतर Ann च्या वडलानी आपली पत्नी आणि २ कन्या यांच्यासह १९३३ साली आपला मुक्काम अमस्टरडेमला हालवला. पण हिटलरच्या साम्राज्य विस्तारामुळे अमस्टरडेम मधेही ज्यूंचे भवितव्य अंधारी बनले. एकाहून एक अपमानजनक बंधने घालत त्याची सुरुवात झाली. हळूहळू त्यांची छळ - छावणीत रवानगी होऊ लागली. त्यातून वाचण्यासाठी Oto Frank  यांनी सहकुटुंब स्थलांतर केले. ६ जुलै  १९४२ रोजी आपल्याच ऑफीसच्याच  कोंदट तळघरात त्यांनी आपला बाड- बिस्तरा हालवला. त्या जागेत बाह्य जगाशी संपर्क तुटलेल्या अवस्थेत राहत असताना Ann Frank या कोवळ्या मुलीच्या मनातील विचारांची अत्यंत मोकळेपणाने आणि धीटपणे केलेली नोंद असे या पुस्तकाचे स्वरूप आहे .  

४ ऑगस्ट १९४४ रोजी त्यांच्या या गुप्त निवासाचा नाझी सैनिकांना पत्ता लागला. नंतर Frank कुटुंबीयांची वेगवेगळ्या छळ - छावण्यात रवानगी झाली. तिथेच Ann आणि तिची मोठी बहीण यांच निधन झाले. तिथून सूटका झाल्यावर Oto Frank जेंव्हा अमस्टरडेमला परत आले तेंव्हा त्याना हे हस्तलिखित मिळालें.  त्यातून हे पुस्तक जन्माला आले . 

या नष्टचर्याला सुरुवात होण्याआधी या सुस्वरूप कन्येला आपण हॉलिवुडमधे अभिनेत्री व्हावे असे कधी कधी वाटत असे. स्वतःच्या लहानपणीच्या एका छायाचित्रावर तशी टिप्पणी तिने केल्याची नोंद या पुस्तकात आहे . पण नियतिच्या संकेतांतून कॅमेराचा उजेड तर सोडाच ; पण या कोवळ्या मुलीला आधी अंधाऱ्या जागेला आणि नंतर छळ - छावणीच्या सर्वंकष अंधाराला सामोरे जावे लागले.  अर्थात ही परिस्थिति तेंव्हा अनेकांच्या वाट्याला आली.  १३ ते  १५ वर्षे हा आयुष्याचा काळ प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एका वेगळ्या अर्थाने महत्वाचा असतो. पण Ann Frank  च्या आयुष्यात तो फारच वेगळा ठरला . 

या काळाने तिला केवळ परिपक्व नव्हे तर फारच समंजस आणि प्रौढ बनवले. अभिनेत्री होण्याची तिची इच्छा जरी पूर्ण झाली नसली तरी  "  I want to go on living even after  my  death  "  ही तिची इच्छा मात्र अगदी नक्की पूरी झाली आहे.  १९४५ साली तिच निधन झाले.  पण आजही तिची आठवण  75 वर्षानंतरही अमर आहे . 

 तिच्या या पुस्तकाचे आज जगातील जवळ जवळ सर्वच भाषांत अनुवाद झाले आहेत.  हे त्या इच्छापूर्तीचेच एक रूप आहे. हे पुस्तक एकदा वाचलेला संवेदनशील वाचक त्याच्या आयुष्यात हे पुस्तक विसरूच शकत नाही हे त्याचे दूसरे रूप आहे.  " नाझी राजवटीत ६० लाख ज्यूंची हत्या झाली असेच केवळ नाही तर प्रत्येक ज्यू वर ६० लाख वेळा मरण्याची वेळ आली "  या आबेल हेर्जबेर्ग यांच्या विधानाची यथार्थता हे छोटेखानी पुस्तक त्याच्या प्रत्येक पानावर पटवत  राहते, हे त्याच आणखीन एक रूप आहे .

सुमारे 70  - 75  वर्षांपूर्वी स्वत:चे अनुभव नोंदवताना Ann Frank ने  या पुस्तकात , डायरीत  व्यक्त केलेले अनेक विचार आजही आपल्याला अंतर्मुख करतात. या पुस्तकातील उल्लेखांचे संदर्भ आज बदलले असतील ; पण त्यांची यथार्थता जरासुध्धा बदललेली नाही .

 " युद्धात प्रत्येक दिवशी कोट्यवधी रुपये खर्च करताना गरीब जनतेसाठी , व्रूद्ध कलाकारांसाठी , आरोग्य , शिक्षण यासाठी निधी अपुरा पडतो असे कोणाच्याहि मनात कसे येत नाही " या Ann Frank ने विचारलेल्या प्रश्नाचा आज संबंध उरलेला नाही असे कोण म्हणू शकेल  ? 
" जगाच्या एका कोपऱ्यात अन्न - धान्याची गोदाम ओसंडून वाहात असताना दुसऱ्या भागात भूकबळी का पडावेत  "  हा या पुस्तकात Ann Frank ने विचारलेला दुसरा प्रश्न हि असाच .
 " एखाद्या निरपराध सामान्य नागरिकाला त्याचे त्याचे जिणे जगता येउ नये, इतकी एखाद्या सत्ताधीशाची मर्ज़ी कशी महत्वाची ठरु शकते आणि त्याचा अटकावही कसा होत नाही, " असाही मुद्दा ती या पुस्तकात उभा करते . 
हे असं या पुस्तकात वाचताना Ann Frank चे  शारिरीक स्वास्थ्य ढासळत असले तरी या बालिकेचे मनोधैर्य जरासुध्धा खचलेले नाही आणि नव्हते याची प्रचिती येत राहाते.  सत्य सांगण्यास तरुण मंडळी जरासुध्धा कचरत नाहीत आणि त्याला सामोरे जायलाही ते घाबरत नाहीत या तत्वावर Ann Frank ची असणारी अढळ श्रध्दा आजही नक्कीच आवश्यक वाटते .  
 अलीकडे घडलेली त्याची उदाहरणे आहेतच की! . 

आज हिटलरहीअस्तित्वात नाही आणि Ann फ्रँकही अस्तित्वात नाही.  पण तिच्या आयुष्याला ग्रासून राहिलेला अतिरेकी वंशवाद वेगवेगळ्या रूपात पुढे येतोच आहे. एखाद्या वंशाच्या तथाकथित श्रेष्ठत्ववादी भूमिकेमुळे इतरांना जगण्याचा आधिकार नाही असे आज उघडपणे कोणी म्हणणार नाही ; पण त्याच्या छटा दिसतातच की! अशावेळी हिटलर हे नाव की व्रुत्ती....

संवादाच्या अभावामुळे वादाचा प्रभाव वाढतो आणि असा प्रभावच अनेकदा अतिरेकी दहशतीला कारणीभूत ठरतो. Ann Frank च्या डायरीमधे उभा राहणारा नाझी दहशतवाद फारच एकारलेला वाटावा अशा विविध स्वरूपात तो आज ऑक्टोपस सारखा फोफावत आहे. वांशिक दंगलीपासून आर्थिक साम्राज्यापर्यन्त आणि वित्तीय मांडलिकत्वां पासून राजकीय अरेरावी पर्यंत त्याची नानाविध रूपे जगभर सर्वत्र आणि सातत्याने सामोरी येत आहेत. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस दोस्त राष्ट्रांनी खनिजांनी सम्रूद्ध असा भूभाग तोडण्यापासून अनेक अपमानकारक अटी जर्मनी वर लादल्या. स्वाभिमानी जर्मनीच्या ह्रुद्यात त्याचे शल्य होते. त्याची चिंगारी फुलवत वांशिक श्रेष्ठत्व हा मुद्दा पणाला लावत हिटलर सर्वसत्ताधिकारी झाला. आज राजकीय मालकी पेक्षाही आर्थिक नाडया ताब्यात असणे महत्वाचे आणि सोयीचे ठरते. त्यातून युद्धे उभी राहतात. अशी युध्द उघडपणे दिसतात तरी !  
पण स्वतः जवळ असणाऱ्या नकाराधिकाराला शस्त्र म्हणून वापरत जागतिक अर्थसंस्थांच्या माध्यमातून लहान आणि अविकसित देशांची कशी ससेहोलपट केली जाते हे सर्वश्रुतआहे. मग "  Masters of Illusion  "  सारखे पुस्तक  Anne Frank  च्या डायरी चे दूसरे रूप वाटू लागते. अशा वेळी भौगोलिक सीमारेषा , राजकीय गटबंध ,  झेन्ड्यान्चे रंग हे निव्वळ मुलामे ठरतात आणि निखळ बहुरंगी , विविधांगी दहशतवाद आ वासून सामान्य नागरिकांचा घास गिळत राहातो.... वेळप्रसंगी चघळत ही !
 त्याचा मुकाबला करण्यासाठी मग Anne Frankची हिम्मत आठवत राहते . 

हे जसे एखाद्या राष्ट्राविषयी, वंशाविषयी , धर्माविषयी खरे आहे तसेच आपल्या दैनंदिन वैयक्तिक आयुष्याबाबतही खरे आहे.  Domestic Violance चा हिटलर...
अशा या धकाधकीच्या जीवनात Anne Frank  सारख्या दीपस्तंभा ची गरज वाढत राहते. 
अशा वेळी Anne Frank १२ जून  १९२९ रोजी जन्माला आली हे खरे ; पण ती १९४५ साली निधन पावली हे खोटे वाटते . कारण Anne  Frank तिच्या म्रुत्यु नंतरही आपल्या मनात जगत राहते.

सरते शेवटी,  हे पुस्तक वाचत असताना मला नेहमीच आमच्या वरसई च्या गोडसे भटजी यांच्या " माझा प्रवास "  या पुस्तकाची आठवण येते. ते पुस्तक १८५७ च्या युद्धाबाबत एका सामान्य माणसाने केलेल्या नोंदी आहेत . त्यातल्या वेदनांची जातकुळी जरूर वेगळी आहे.  पण या दोन्ही पुस्तकातले साम्य म्हणजे निरपराध सामान्य नागरिकांनी केलेल्या नि:पक्षपाती, स्वानुभवावर आधारीत अशा या नोंदी आहेत. म्हणून त्या खुप महत्वाच्या आहेत . . . 
साहित्य म्हणूनही आणी इतिहास म्हणूनही . 






7 जून 2020

Thursday, May 14, 2020

आत्मनिर्भर भारत अभियान....

मंगळवार , १२ मे २0२0 रोजी रात्री ८ वाजता माननीय पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण ऐकत असताना ,आणि नंतरही , काही विचार मनात आले.
ते असे.....

१ .  या भाषणात जेंव्हा त्यांनी पहिल्यांदा " आत्मनिर्भर भारत " हा शब्द उच्चारला तेंव्हा मला एकदम अरुणा ढेरे यांच्या " मैत्रेयी " कादंबरीची आठवण आली.
त्या कादंबरीच्या शेवटी येणारया एका प्रसंगात मैत्रेयी याद्न्यवल्क्य ऋषी यांच्याकडे अशी मागणी करते की  " तुम्ही जर काही मला देणार असाल तर तुमच्यात असणारी मी  मला परत द्या. माझे आत्मभान मला परत द्या. " 
सध्याच्या परिस्थितीत आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था पंतप्रधानांच्या मुखातून कींवा द्वारे असच काहीतरी मागत होती का?

२ .  त्या संबोधनाचा पहिला भाग काहींना अनावश्यक वाटत होता. अगदी त्याच्यापेक्षाही काही पलिकडचे काहींना वाटत असल्याचे माननीय पंतप्रधानांचे भाषण पूर्ण होण्याआधीच सोशल मीडियावर झळकू लागलेल्या पोस्टवरून आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आले आहे.
मला तेंव्हा रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी एकदिवसीय क्रिकेट सामन्यात जशी फलंदाजी करतात त्याची निष्कारण आठवण येत होती. ते दोघे कसे आधी अगदी अंत बघितला जाईल इतकी धीमी फलंदाजी करतात . वेळप्रसंगी आवश्यक धावगती अशक्य वाटावी अशा पातळीवर जाऊ देतात . आणि मग अचानक ते दोघं गियर बदलतात. क्रिकेट सामना त्यातून उत्कंठावर्धक होतो. आणि मग शेवटच्या षटकात कींवा चेंडूवर षटकार...
काल थोडेफार तसे काही तरी चाललं होते का....
तो शेवटच्या चेंडूवर षटकार बसला आहे की नाही हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही.
त्यासाठी अर्थमंत्र्यांनी केलेल्या प्रत्यक्ष घोषणांसाठी थांबावे लागेल....
तसंही  राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या १0 टक्के... सुमारे 20 लाख कोटी रुपयांचा प्रश्न आहे हो !

३ .  कालच्या भाषणात ज्या गोष्टींचा उल्लेख झाला त्या महत्वाच्या आहेतच !
पण त्याहीपेक्षा महत्वाचे आहे ते ज्याचा प्रत्यक्षात भाषणात उल्लेख केला नाही पण त्याबाबत कोणतीही संदिग्धता शिल्लक ठेवली नाही अशा काही गोष्टी हे कालच्या भाषणाचे खरे वैशिष्ट्य आहे. 
यातली अशी पहिली गोष्ट म्हणजे " स्वदेशी " 
संपूर्ण भाषणात स्वदेशी या शब्दाचा एकदाही उल्लेख नाही... पण Be vocal about being local म्हणजे दुसरे काय ?
यांत राजकीय संतुलन किति आणि परीवारात्मक ताणतणाव किति हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी हे संपूर्ण भाषण हे Strategic Drafting चे अस्स्खलीत उदाहरण आहे.

अजून एक...
कदाचित तो माझ्या आडनावाचा दोष असावा... 
पण हा मुद्दा मांडला जात असताना मला एक भाबडी आशा होती की माननीय पंतप्रधान एकदा तरी लोकमान्य टिळकांचा उल्लेख करतील... कारण भारतीय राजकारणात व राजकीय अर्थकारणात " स्वदेशी " या शब्दाचा उल्लेख सगळ्यात पहिल्यांदा लोकमान्यांनी केला. 
तोही १९०५ साली.
नुसता उल्लेख केला असं नाही तर तो सातत्याने कार्यान्वित केला आणी ठेवलाही!

लोकमान्य टिळक यांचा नावानिशीवार उल्लेख पंतप्रधान त्यांच्या या भाषणात करतील अशी भाबडी आशा वाटण्याचे अजूनही एक कारण म्हणजे आपल्या स्वदेशीला कार्यान्वित करताना आणी त्याची राष्ट्रीय उद्दिष्टांशी सांगड घालताना आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण यांचा चपखल उपयोग करणारा पहिला भारतीय नेता म्हणजे लोकमान्य टिळक.
आज केवळ आपणच एक देश म्हणून स्वदेशीकडे वळतो आहोत असे नाही तर अमेरिका, जर्मनी , युरोपीय युनियन, ऑस्ट्रेलिया , जपान, व्हिएतनाम, कोरिया, आणि अगदी स्वतः चीन दुसरे काय करत आहेत ? 

शिवाय तसंही सध्या लोकमान्य टिळकांचे स्म्रुति शताब्दी वर्ष सुरू आहे...

पण तसा उल्लेख झाला नाही....
कदाचित सत्तारूढ पक्षाच्या सध्याच्या धोरणात ते बसत नसावे !
कोणाविषयिही जरासूद्धा दुस्वास नाही ; पण वाटलं खरं!
इथेही आणी असेही टिळक ....

४ .  ज्याचा उल्लेख नाही पण या भाषणाची संपूर्ण पार्श्वभूमी असणारा असाच दुसरा शब्द म्हणजे.... " चीन " .
केवळ चीनमधे आणि चीनमुळे कोरोना सुरू झाले आणि सुरू राहिले इतक्या पुरेसाच तो संदर्भ मर्यादीत नाही हे निश्चितच!
त्यानंतरही चीन ने आंतरराष्ट्रीय अर्थकारणात आणि राजकारणात ज्या खेळ्या सुरू ठेवल्या आहेत आणि सुरू केल्या आहेत त्याबद्दलचे धोरणात्मक असं पाऊल म्हणूनही पंतप्रधान मोदींच्या या भाषणाकडे पाहावे लागेल. 

५ .   ज्या गोष्टींचा उल्लेख माननीय पंतप्रधानांच्या भाषणात स्पष्टपणे केला गेला आहे त्याच्याकडे वळताना " खादी आणि हँडलूम " हा विषय.
गेली जवळजवळ दिड- दोन दशके माझ्या व्यावसायिक वेळापत्रकाचे स्वरूप असे आहे की महिन्यातले १७ - १८ दिवस मी फिरतिवर असतो... महाराष्ट्रातही आणि आपल्या देशातल्या इतर सगळ्या राज्यातही...
त्यामुळे स्वानुभवाने सांगू शकतो की या उद्योगांनी गेल्या ६ वर्षात कमालीची कात टाकली आहे.,.
१९८0 च्या दशकात पुपुल जयकरानी इंदिराजींच्या प्रोत्साहनामुळे याबाबत खरी कामाला सुरवात केली असली तरी त्याआधी आणि त्यानंतरच्या काळात हा विषय फक्त बोलण्यापूरेसाच मर्यादीत होता हीही तितकीच वस्तुस्थिती आहे.  
२0१४ नंतर हे चित्र बदलले हीही तितकीच वस्तुस्थिती आहे.... 
अगदी राजकीय द्रुष्त्याही आणि आर्थिक ही!!!

एक मोदी जाकिट हा प्रकार आज  वर्षाला काही हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करतो... कारण गल्ली -बोळापासून ते कॉर्पोरेट बोर्डरूम पर्यन्त वस्त्रप्रावरणाचा हा प्रकार एकाचवेळी " Casual " म्हणूनही आणि त्याचवेळी " Formal " म्हणूनही प्रचलित झाला आहे. अगदी १00 रुपयांपासून कित्येक हजार रुपयांपर्यन्त मिळणारया या प्रकाराने कोट- ब्लेझर- सूट हे प्रकार भारतीय बोर्डरूम मधून हळूहळू बरखास्त करायला सुरवात केली आहे.. 
" मोदी जाकिट " या शब्दप्रयोगातल्या पहिल्या शब्दाची काहींना कितिही अलर्जी असली तरी व्यावसायिक वस्तुस्थिती कशी नाकारता येईल ?

६ . पंतप्रधान मोदींच्या या भाषणात  20 लाख कोटी रुपये असा उल्लेख आला तेंव्हाच मनात आले की आत्ताच्या परिस्थितीत इतके पैसे आणणार कुठून ही चर्चा होणार. 
अगदी अपरिहार्यपणे होणार.
एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय ( आणि ज्येष्ठ नागरिक होऊ घातलेला) पगारदार माणूस म्हणून पोटात गोळा आला की याची धाड आपल्यावर येणार.  जेंव्हा  पंतप्रधानांनी त्यांच्या या भाषणात करदात्यांचे कौतुक सुरू केले तेंव्हा तर शंकेची पाल जोरात ओरडली ( नुसती चुकचुकत बसली नाही) की " बाबा रे तयार राहा! " 
कारण 2014 नंतरचाही आणि आधीचाही आपला राजकीय अर्थकारणाचा आणि आर्थिक राजकारणाचा इतिहास असा आहे की पंतप्रधान आणि अर्थमंत्री हे व असं कौतुक करायला लागले की ओळखायचे असते की हे आता आवळा देऊन ( कींवा न देताही ) कोहळा काढणार. ( मी कोहळा म्हणले आहे; कोथळा नाही हे आवर्जून लक्षात घ्यावे.) 
जर हे खोटे वाटत असेल तर अर्थसंकल्प सादर होताना केलेली भाषणं उदाहरण म्हणून काढून बघायला हरकत नाही... अशा भाषणाचा पार्ट A संपत असताना कौतुक- धन्यवाद आले की समजून जायचे असते की पार्ट B च्या तरतूदीत काहीही हाती लागणार नाहीये.
पण...
पण कालच्या भाषणात मध्यमवर्गीय मंडळींना दिलासा देणार असें पंतप्रधान म्हणाले आहेत. 
त्यामुळे आपण विश्वास ठेवला पाहिजे...
" पंतप्रधानांनी दिले आणि अर्थमंत्र्यांनी काढून घेतले" असं थोडेच होइल ? 
शुभ बोल रे !!!

७ .इतकी मोठी रक्कम उभी करताना जर देशांतर्गत करदात्यांवर भार टाकायचा नसेल ( तसच होऊ दे रे देवा... आले नरेन्द्रजी व निर्मलाजी यांच्या मना ) तर मग सुमारे ३५ - ३८ लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनांच्या गंगाजळीला ( आपल्या नेहमीच्या मराठीत फॉरेक्स रिझर्व्हज ) तर हात लावला जाणार नाही ना ? 
असा विचार मनात येत असतानाच असंही क्षणभर वाटले की एकीकडे परकीय चलनांच्या गंगाजळीचा असा प्रासंगिक सदुपयोग करत असताना दुसरीकडे त्या गंगाजळीत सातत्याने भर घालण्याच्या उद्देशाने  निर्यातवाढीला चालना देणारया पावलांचा अर्थमंत्र्यांच्या घोषणांमधे समावेश असेल का?
त्याचवेळी मुळात आयातीवर काही प्रमाणात बंधने घालणारया गोष्टी येणारया काळात अर्थमंत्री जाहीर करतील का?
तसेच आयातीचे पैसे परकीय चलन कींवा आपला रुपयांच्या मोबदल्यात देण्याऐवजी आपल्या देशात बनलेल्या वस्तूच्या रूपात ( मेड इन इंडिया चे अंतिम स्वरूप) देण्याला प्रोत्साहन देणारे असे काही धोरण केंद्रीय अर्थमंत्री येत्या काही दिवसांत या पकेजचा भाग म्हणून सांगणार का? 

८ .  सातव्या मुद्द्याचा विचार करत असताना असाही विचार मनात तरळून गेला की निर्यात आकर्षक करण्यासाठी आणी आयात महाग करण्यासाठी आपल्या रुपयाचे अवमूल्यन ( डिवल्युएशन., Devaluation) करण्याची घोषणा तर होणार नाही ना? 
हा विचार मनात आल्यापासून मी  संपूर्ण भाषण श्वास रोखून होतो. 
कारण माननीय पंतप्रधानांची आजपर्यंतची कार्यशैली बघता अशी आणि इतकी महत्वाची घोषणा ते स्वतः न करता केंद्रीय अर्थमंत्री करतील ही शक्यता कमी आहे.
अशी घोषणा या भाषणात तरी आलेली नाही . त्यामुळे सध्या तरी असा विचार नसावा असं मी स्वतःलाच सांगतो आहे.
पंतप्रधानांच्या पुढच्या राष्ट्रीय संबोधना पर्यन्त....
( बघा ना.... खरं म्हणजे, त्याच दिवशी सकाळी अर्थमंत्री सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांना भेटणार होत्या . पण ती मीटिंग ऐनवेळी रद्द झाली. तेंव्हाच माझ्या मनात आले की पंतप्रधान त्यांच्या या भाषणात आर्थिक पकेज घोषित करणार... तसच झाले की हो!!) 

९ . पंतप्रधान काय किंवा अर्थमंत्री काय , अशी मोठी घोषणा करताना पद म्हणा, व्यक्ती म्हणा म्हणून पुढाकार जरूर असतो ; पण ती एक प्रक्रिया असते. त्यामुळे इतकी मोठी रक्कम घोषित करताना सरकारी पातळीवर नक्कीच विचार झाला असणार.
बँकांना डिव्हिडण्ड घोषित करण्यापासून परावृत्त करणे हा त्याच प्रक्रियेचा भाग होता का ? 
याआधी जाहीर झालेल्या काही योजना या पकेज चा भाग असतील का ?
असा विचार करत असताना मग हळूहळू लक्षात येते की पुढच्या ५ वर्षात आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था अगदी ४. ५ ते ५ टक्के दरानि वाढली तरी 20 लाख कोटी रुपयांची भरपाई करणे फारसे कठीण नाही. 

10 .  पंतप्रधानांच्या या भाषणातले सगळ्यात जास्त महत्वाचे ( माझ्या मते) विधान म्हणजे  " Not the incremental ; but the quantum jump in economy " . हे विधान केवळ आकर्षक कींवा आक्रमक नाही तर आश्वासक आहे. सध्याच्या निराशाजनक परिस्थितीत तर नक्कीच ! त्यासाठी Economy , Infrastructure , System , Demography आणि Demand या पांच गोष्टींवर प्रामुख्याने आधारीत असे हे पकेज असेल असं सांगत असतानाच त्याची भिस्त Supply Chains वर असेल असं जेंव्हा माननीय पंतप्रधान म्हणतात तेंव्हा आशेची अनेक किरणं दिसू लागतात. कारण  क्रुषि उत्पादनापासून वीज व पाण्यापर्यंत  आणि शिक्षणापासून राजकारणापर्यन्त  आपल्या देशात उत्पादन ही समस्या नसून वितरण हा जटील प्रश्न आहे. ( कोरोना चा संसर्ग हा अशा वितरण व्यवस्थेतील वेगळ्याच प्रकारची समस्या अधोरेखित करते.

११. असं सगळं ऐकत असताना मनामधे एक येत राहाते की माझ्या सारख्या सामान्य माणसाला हे समजावे आणि निदान त्याबाबत तरी आत्मनिर्भर व्हावे म्हणून यापुढे वेळोवेळी सरकार नागरिकांना हे 20 लाख कोटी रुपये कसे आणि कधी दिले गेले हे वारंवार स्पष्ट करत राहील ना !!!

१२ .  एकंदरीत काय , आत्मनिर्भर भारत अभियान म्हणजे या लॉक- डाऊन च्या काळात सवय लागल्या प्रमाणे आपण आणी आपल्या राहत्या वस्तीतला वाणी, आपल्या वस्तीतला दूधवाला- भाजीवाला- इस्त्री वाला-- फळं वाला...
उल्लेख न करता मल्टी- ब्रँड  रिटेलची ऐशी- तैशी....

अशा अनेक गोष्टी स्वतःला विचारत राहावे लागेल. त्याची उत्तरे शोधावी लागतील.
मला कालच्या " आत्मनिर्भर भारत अभियान " चा अर्थ समजून घेताना श्री. म. माटे यांच्या " देश म्हणजे देशातली माणसे" याचीच सारखी आठवण होत होती..
आपण नागरिक म्हणून आत्मनिर्भर तर आपला देश ही आत्मनिर्भर !!!





१३ मे २0२0.

Friday, May 8, 2020

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र - म.टा. मध्ये प्रकाशित झालेला लेख


आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजेच इंटर नॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर कींवा आयएफसी हा शब्द अलीकडे एकदम प्रकाशात आला. तो एखाद्या धूमकेतू सारखा चलनात आला आणि जर मुद्दामून लावून धरला गेला नाही तर त्या आणि तशा धूमकेतू सारखाच चर्चेच्या परीघाच्या बाहेरही जाईल.

आजमितीला या शब्दप्रयोगा बाबत तुमच्या- माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनात काही प्रश्न आहेत.

त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की ही एखाद्या राजकीय विषयाची चर्चा आहे की एका आर्थिक विषयाची? 
आर्थिक धोरण हा विषय तसा एरवीही राजकारण आणि अर्थकारण यांच्या सीमारेषेवर घुटमळत असतो हे जरी कितीही मान्य केले तरी या विषयाबाबत ही सीमारेषा , निदान सध्यातरी , जरा जास्तच ताणली जात आहे. 
टेनिस मधे लाईन कॉल कींवा क्रिकेट मधे क्रीज - लाईन यांचे निर्णय थर्ड अंपायर कडे कींवा रिव्ह्यू साठी तरी सोपवता येतात. इथे तशी काही सोय नाही का असाही एक अनुशांगिक ( की प्रासंगिक) प्रश्न याबाबत पडावा अशीही परिस्थिती निदान सध्यातरीआहे. 
जस २६ मे ला आपल्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका हे उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय पंतप्रधानांना केलेल्या एका फोन मधे मिळाले तसे या प्रश्नाचे उत्तर एका फोनवर कींवा पत्राने मिळाले नसते का ? 
कींवा निदान तसा प्रयत्न केला गेला का?
 की हा प्रश्न तेवढा महत्वाचा, तातडीचा व प्रतिष्ठेचा वाटला नसावा का? 
ह्या दोन्ही प्रश्नात असणारे दोन्ही ( कींवा तिन्ही) पक्ष एकच आहेत म्हणून हा मुद्दा मनात आले इतकेच!!!
बाकी काही नाही.
कोणालाही दुखावण्याचा उद्देश तर जरासूद्धा नाही.

मुळात हा मुद्दा एकदम आत्ताच का आणि कोठून आला ?
अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्याबाबत चा उच्चस्तरीय समितीचा ( पर्सी मिस्त्री समिती) अहवाल 2007 सालीच तत्कालीन केंद्र सरकारला सादर केला गेला होता. त्याच्या मागे- पुढे एका केंद्रीय अर्थसंकल्पात ( अर्थसंकल्पीय भाषणात)  मुंबईत असे केंद्र सुरू करण्याचा उल्लेख सुद्धा होता. काही रक्कम त्यासाठी तरतूद -वजा प्रस्तावितही केली होती. पण 2007 ते 2014 या काळात याबाबत फारसे काही झाले नाही.... तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकार आणि तत्कालीन केंद्र सरकार यांनी त्याबाबत काहीही हालचाल केली नाही असे राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते ( आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री) असे सध्या सोशल मीडिया मधे फिरत असलेल्या त्यांच्या वीडियो मधे सांगताना दिसतात. त्याचा इन्कार सध्याच्या राज्य सरकारनी अजूनतरी केलेला नाही. 
त्याच वीडियोत असंही सांगितले गेले आहे की हा अहवाल सादर झाल्यावर महाराष्ट्राने काहीही केले नसले तरी त्या समितीच्या त्या अहवालाचा आधार घेत गुजरातच्या तत्कालीन व त्यानंतरच्या सर्वच सरकारांनी याबाबत सातत्याने पावले उचलत असे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरात च्या गांधीनगर मधे ( गिफ्ट सिटी) सुरू सुद्धाकेले.अगदी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून ! 
2014 नंतर महाराष्ट्र सरकार ने याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला आणि आपल्या राज्याचा याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार कडे आहे. याचाही आजपर्यंत कोणी जाहीर इन्कार केलेला नाही. 

गंमतीचा भाग म्हणजे हा विषय केंद्र सरकारकडे पुन्हां घेऊ असं ना राज्य सरकार म्हणत आहे ना राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते.... महाराष्ट्राच्या राजकारणाने " पुन्हा " या शब्दाची इतकी धास्ती घेतली  आहे की काय!!!

ज्या विषयावर इतक्या थोडक्या कालावधीत असा गदारोळ झाला, उडाला, उडवला गेला त्या विषयाचा जीव इतका खरंच मोठा आणि महत्वाचा आहे का  ?
 आणि असला तरी सध्याच्या करोना च्या काळात तो तितका आवश्यक प्राधान्याने घेण्याचा आहे का? 
जसं एखाद्या बँकेचे कामकाज करण्याचे लायसन रद्द करणें पुढे ढकलता आले असते तसे हा गदारोळ आत्ताच करणे खरंच गरजेचे आहे कींवा होते?

सध्याच्या या चर्चेचा केंद्रबिंदू आहे ती आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा संस्थेच्या नियंत्रक संस्थेचे कार्यालय गुजरात मधे सुरू करण्याची 27 एप्रिल 2020 रोजी झालेली घोषणा. मुंबई, पर्यायाने महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी असं मानले- म्हणले जात असताना हे केंद्र गुजरात मधे का आणि कसे हा या वादळाचा गाभा !

मुळात ही संकल्पना काय आहे?

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र ही संकल्पना राष्ट्रीय अर्थकारणाला एका चांगल्या आणि वेगळ्या व उच्च पातळीवर नेण्यासाठी उपयुक्त संकल्पना आहे हे निर्विवाद!
आणि त्यामुळे ती संस्था आपल्या राज्यात असावी असं वाटणे केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न असत नाही. 
अगदी मर्यादीत अर्थाने सांगायचे झाले तरअनेक सरकारी योजनांच्या विविध प्रक्रिया साठी " एक खिडकी योजना " असावी तशा स्वरूपाचे काम असे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र करते. 
किमान तशी त्याच्या कडून अपेक्षा असते. 
अशी संस्था आपल्या देशात SEZ ( स्पेशलाईज्ड एकॉनोमिक झोन ) मधेच असू शकते. त्यासाठी स्वतंत्र वित्तीय सेवा झोनची कायदेशीर तरतूद आहे.
अशी भौगोलिक रचना उदाहरण म्हणून दिलेल्या " एक खिडकी योजना " तल्या खिडकीची जागा घेते. अशा sez मधल्या प्रकल्पाला असणारया वैशिष्ट्यपूर्ण सवलतीची पूरेपूर जाणीव ठेवत भारतीय उद्योजक, त्यांचे विदेशी सहाय्यक कींवा भागीदार, त्यांच्यातील कर्जाची व तंत्राची व्यावहारिक बाजू आणि प्रत्यक्षात व्यवहार याबाबतची आवश्यक ती संस्थात्मक व व्यावहारिक मदत अशा संस्थेने उपलब्ध करून देणे अपेक्षित असते.j
केवळ कर्ज च नव्हे तर अशा कंपन्यातल्या भांडवली गुंतवणुकीचे व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यातली मदतही अशी संस्था करते. अशा व्यवहारात केवळ आपल्या देशातील कायद्याचीच नव्हे तर संबंधित विदेशी भागीदाराच्या देशातील कायद्याने बंधनकारक केलेल्या तरतूदीण्चेही भान सतत ठेवावे लागते. भांडवल उभारणी ते शेअरबाजारात नोंदणी ( स्टॉक एक्स्चेंज लिस्टिण्ग) असा त्याचा पल्ला असतो .
आणि हा प्रकल्प जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत त्याची व्याप्ती असते. आणि हे फक्त आपल्या देशातील कायदा डोळ्यांसमोर ठेवून करून भागत नाही. 
अशा कंपनीच्या कारभारातल्या प्रत्येक टप्प्यावरच्या जोखमीचे मूल्यमापन आणि नियोजन ( रिस्क मनेजमेन्त) हा त्यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग असतो.... अगदी सर्वार्थाने!!!

या प्रकारचे व्यवहार देशांतर्गत तसेच परदेशी नागरिक कींवा कंपन्या करत असतात. त्यात सहसा बँका , विमा कंपन्या, वित्तीय सल्लागार यांचा पुढाकार असला तरी वेळप्रसंगी संबंधित देशांची सरकारे कींवा सरकारी संस्थाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहभाग असू शकतो.
आणि त्यामुळे हे सगळे गणित " हाय- स्टेक, हाय- ग्लमर ,हाय- प्रोफाईल, हाय- कमांड " स्वरूपाचे असते.
( उदाहरणार्थ.... सध्या चे आपल्या देशातले टेलिकॉम क्षेत्रातले बहुचर्चित.....)

त्यातही विदेशी भांडवल, विदेशी तण्त्रड्ण्यान , विदेशी बाजारपेठ हा विषय सगळ्याच देशांत नेहमीच संवेदनशील असतो हे लक्षात घेतले आणि त्यातही आपल्या देशाचे जागतिक अर्थकारणात असणारे कींवा नसणारे स्थान लक्षात घेता अशा यंत्रणेची आवश्यकता या मुद्द्यावर दुमत व्हायचे कारण नाही. 
आणि हे सर्वच विदेशी चलनात....
कदाचित म्हणूनच तो आता ऐरणीवर आला असावा. 
कारण करोना नंतरच्या अर्थकारणात त्याची गरज जास्तच असेल.

अशा संस्था कोणत्याही देशात एकापेक्षा जास्त असू शकतात. एकापेक्षा जास्त बँकां , एकापेक्षा जास्त स्टॉक- एक्स्चेंज, एकापेक्षा जास्त विमा- कंपन्या , एकापेक्षा जास्त म्युच्युअल फंड , एकापेक्षा जास्त कमोडिटी एक्स्चेंज जर अर्थव्यवस्थेत एकाचवेळी असू शकतात तर एकाचवेळी एकापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र एकाच राष्ट्रीय अर्थकारणात असू शकतात. प्रश्न इतकाच आहे की जर असे एक सेवा केंद्र आधीच सुरू झालेले असताना दुसरे केंद्र सुरू होण्याची प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर रेंगाळली आहे? 
याबाबत कोणीच काहीच बोलत नाही हे आश्चर्यच आहे.
आणि ही प्रक्रिया रेंगाळली आहे, अडकली आहे की अडकवलि गेली आहे हेही तसेच गुलदस्त्यात !!!

आत्ताचा वाद अशा केंद्राबाबत आहे की अशा केंद्राच्या नियंत्रक संस्थेच्या बाबत आणि त्याचे मुख्य कार्यालय कुठे असावे याबाबत आहे हा खरा प्रश्न आहे.
हा वाद कींवा गदारोळ कींवा चर्चा आर्थिक स्वरूपाची आहे असं मानले तर जिथे ज्या संस्थांचे कामकाज सुरू आहे तिथेच त्याचा नियंत्रक असणे हे तर्कशुद्ध आहे. आजमितीला आपल्या देशात अशा स्वरूपाची कार्यरत असणारी एकमेव, अगदी एकमेव संस्था जिथे काम करत आहे तिथेच त्याच्या नियंत्रक संस्थेचे कार्यालय असण्याची केंद्र सरकार ने 27 एप्रिल 2020 रोजी केलेली घोषणा वावगी नाही.
आणि भविष्यकाळात हे कार्यालय दुसरीकडे हलवता येणार नाही असं काही नाही.
त्यामुळे त्या संस्थेचे भौगोलिक स्थान महत्वाचे नसून ही संपूर्ण यंत्रणा किति आणि कशी प्रभावीपणे उपयोगात आणू शकू हे महत्वाचे आहे. सध्याच्या तंत्र- प्रधान जमान्यात भूगोल महत्वाचा नसतो .

सध्याचा ही चर्चा राजकीय असेल तर मग सरकार एकीकडे आणि रिमोट कंट्रोल दुसरीकडे हा तर आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे की अगदी कोणताही पक्ष अपवाद नसणारा !







६ मे 2020.

Tuesday, May 5, 2020

सुवर्णा जोशी यांचे मनोगत - मला आवडलेलं पुस्तक

    मध्यंतरी श्री.चंद्रशेखर टिळक सरांना मी विनंती केली म्हणून त्यांनी त्यांची आठ पुस्तकं मला पाठवली. अतिशय सुरेख आहेत पुस्तकं.  एक अर्थतज्ञ,  त्या विषयावरचे सुप्रसिद्ध व्याख्याते असलेल्या सरांचा एक वेगळाच पैलू  त्यांच्या पुस्तकातून पहायला मिळाला, एक मिस्कील,  रसिक, उमदा,  अलवार जाणिवेचा रसिक अनुभवायला मिळाला. 

     आज मी सरांच्या " मल्हार मनाचा" या मला अतिशय आवडलेल्या पुस्तकाविषयी थोडसं, मला जमेल तसं लिहितेय. या पुस्तकाविषयी सर असं म्हणालेत," एखाद्या घटनेच्या सादेला मनाचा प्रतिसाद जरी लगेच मिळाला आणि तो एकदाच आला तरी त्याचा मल्हार मनात सतत बरसत असतो. अशा आठवणींचे चंदन आयुष्याच्या सहाणेवर कळत नकळत उगाळले जातेच.  अशा सुगंधाला लघुकथा व ललित लेख यांच्या सीमारेषेवर लेखनबद्ध करणारे पुस्तक. " 

पहिला ललितलेख  आहे "कल्पिता". यात तीन मित्र आणि त्यांची एक मैत्रीण कल्पिता  यांची अनोखी कथा आहे.  यापैकी एक मित्र म्हणजे टोळकं सरच आहेत असं मला वाटलं.पन्नास वर्षे झाली आहेत त्यांच्या मैत्रीला.  तीन मुलगे आणि एक मुलगी असली तरीही जितकी चार मित्रांची मैत्री सच्ची असते, निर्मळ असते, तितकीच यांची मैत्री सच्ची आहे. सहवासाने सगळेजणं एकमेकांच्या आवडीनिवडी,  सवयी याविषयी सतत जाण ठेवून एकमेकांना जपणारे आहेत. आत्ता ते भेटलेत तेव्हा ते आयुष्यात स्थिरस्थावर झालेत आणि तिच्यासह सर्वांची लग्नं झालेली आहेत. तिचा नवरा पण ही अनोखी मैत्री समजून तर घेतोच पण त्याला त्या मैत्रीचा अभिमानही आहे. एकमेकांच्या मनाजवळ असणं म्हणजे खरी मैत्री,  हे पटलं. आत्ता तर याचा खूपच अनुभव घेतोय आपण !!!

         दुसरा लेख रांगोळी हा मला सर्वात जास्त आवडलेला लेख,  सर्व लेखांवर लिहीलं तर पुस्तक होईल, म्हणून मला विशेष आवडलेत त्या बद्दल लिहीणारे. रांगोळी आपण सगळेच नेहमीच बघतो,  आम्ही बायका तर रोजच रांगोळी काढतो, अगदी मला छान रांगोळी काढता येत नसली तरीही निदान देवासमोर तरी रांगोळी काढून त्यावर हळदीकुंकु घालतेच मी !! त्या रांगोळी विषयी इतका अनोखा, मनाला भिडणारा, मोह घालणारा,अलवार विचार कोणी करेल असं मला वाटलं नव्हतं.  रांगोळी म्हणजे एक घरंदाज कलाकृती असून घरातील वातावरणाचा अंदाज देणारी एक बाब आहे, रांगोळी मला तिचा पहिलाच दिवाळसण साजरा करायला माहेरी आलेल्या लेकीसारखी माहेरवाशीण वाटते!! घरगुती पण आवडीची!! आपल्या वाढत्या वयानुसार रांगोळी काढायला बसलेल्या माहेरवाशीणींचे भावणारे रुप कदाचित बदलत असेल!! किती छान वाटतं हे सगळं!! या कथेत आपल्या, लेकीच्या आणि होणार्या सुनेच्या मायेची अलवार आणि सुरेख रांगोळीच काढलेली आहे. या लेखात सरांचं कर्तृत्ववान, कणखर आणि तरीही कनवाळू, पण भावुक रुप मनाला भावलं. एकाच माणसाची अशी अनोखी रुपं बघायला मिळतात, हेच तर वैशिष्ट्य आहे या पुस्तकांचं.  

           अपेक्षा या लेखात एक बाॅस आणि तरुण, बाॅसच्या लेकीसारखी असलेली कलीग यांची अनोखी कथा आहे.  बाॅस अनुभवी आणि मायाळू आहे. नवीनच आलेली कलीग ही सगळं काम शिकून आता नक्कीच प्रमोशन मिळवेल याची खात्री असली तरीही तिची काळजी, हुरहुर आहे. त्या दोघांचं ते अनोखं नातं, बाॅसने तिला वडिलांसारखं प्रोटेक्ट करणं,  तिची काळजी घेऊन तिला यशस्वी होण्यासाठी मदत करणारे असे बाॅस, आणि आपल्या वडिलांसारखं माया करणारं माणूस मिळालं म्हणून काम करतांना झटणारी आणि मनापासून हे नातं आवडणारी मुलगी,  खूप छान वाटलं. आजच्या काळात जे अनुभव सगळीकडे रंगवतात, बाॅसशी लफडं,  प्रमोशन मिळू नये यासाठी कटकारस्थानं,  मुलगी पाहिली की फक्त  वासना मनात बाळगणारे पुरुष,  या पार्श्वभूमीवर ही कथा विशेष आवडली.  शिवाय मला स्वतःला असेच बाॅस मिळाले होते, माझ्या पहिल्या नोकरीच्या काळात. अप्रतिम कथा.

                पुढची कथा आहे " माझी गं - ती सासू " हे मनोगत आहे एका सुनंचं,  जिच्या आयुष्यात सासुचं योगदान खूप मोठं आहे.  यातल्या सुनेला आयुष्य कसं सुखदायी करायचं यासाठी मंत्र दिला तो सासुबाईंनी.  संसारातील सगळी कर्तव्य पार पाडत असतांना आपले छंद जोपासले तर जगणं आनंददायी होतं म्हणून गाणं शिकणं,पेंटींग, क्राफ्ट हे छंद जोपासायला प्रोत्साहन दिलं, अगदी मुलाला करुन वाढायच्या तशी गरम तव्यावरची पोळी सुनेला करुन वाढली. नाटकात काम करणं, निवेदन करणं यासाठी तयारी करायला वेळ दिला, वाचन कर,माहिती घे अशा सूचना दिल्या.  हे सगळं मला अद्भुत वाटतं. मुलीला काय करायचेत नसते छंद ,असं म्हणणार्या आया खूप बघितल्यात,  पण हे म्हणजे अतिशय आवडलं. मी सासू होणार नाही, पण होता होईतो शेजारीपाजारी किंवा मैत्रीणींना मदत नक्कीच करेन. 

     "मन पाखरु पाखरु " हा एक अप्रतिम लेख आहे, या विषयावर असं काही लिहीता येईल, असं हा लेख वाचेतो माझ्या मनातही आलं नव्हतं. एक अगदी छोटासा विषय, एक चित्रं: पूर्णपणे निष्पर्ण वृक्ष., मात्र त्याच्यावर एकमेकांकडे तोंड करुन बसलेले कितीतरी रंगीबेरंगी पक्षी आहेत.  या चित्राकडे पाहून लेखकाच्या मनात आलेले विविध विचार वाचून स्तिमित झाले. आपणच एक निष्पर्ण वृक्ष आहोत की काय? की आपण रंगीबेरंगी पाखरु आहोत? यातच एक विचार असा की आठवणी पण पाखरु असतात, यातच कबीराचे दोहे आठवून आयुष्याची दिशा दाखवणारे विचार मांडलाय. शेवटी तर निष्पर्ण झाडं ही प्राप्त परिस्थिती आणि संवादाची आवश्यकता अधोरेखित करणारे ते पक्षी!! किती सुरेख विचार !!!

         "सांगाती "  ही बहुदा सरांची आठवण सरिता असावी. मुरलेल्या लग्नानंतर एकमेकांना न बोलता,  न सांगता परिपूर्ण ओळखणारे ते दोघं  !! काॅलेजमधल्या प्रेमाची अलवार आठवण, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणारे, तरीही छोट्या छोट्या गोष्टीत होणारे  रुसवा फुगवा,  मनवणं  हे इतकं अलवार,  तरीही रोमँटीक वाटत,  नवीन पिढीला ते अद्भुत वाटेल. 

       एक वेगळीच कथा म्हणजे " कुरकुरे " जुही चावलाची जाहिरात " टेढा है, पर मेरा है " नवरा आणि कुरकुरे याची अनोखी तुलना म्हणजे कुरकुरे!! तुम्ही वाचा, मी सांगत नाही.  

      " तुझं माझ्याकडे लक्ष नाही" 
        यात वेगवेगळे अनुभव लिहिलेत,  ते तुम्ही वाचा, मी वाचल्या नंतर "तुझं माझ्याकडे लक्ष नाही" यातले कितीतरी अनुभव माझ्या मनात आले. एकदा  सकाळी कामाची गडबड असते, तेव्हा सगळं आटोपून हाॅलमधे आल्यावर मी सासुबाईंना सूचना देत देत माझं आवरत होते, " थर्मासमधे काॅफी आहे, तुमच्या गोळया डबीत काढून ठेवल्या आहेत,  आज भाजी तुमच्या खास आवडीची नाही म्हणून आंबोशीचं लोणचं टेबलावर काढून ठेवलंय,  तेवढ्यात अहो पेपर वाचत बसले होते,  ते म्हणाले, " तुझं माझ्याकडे लक्ष नाही, अजून माझं आवरलं नाहीये, मी आज जात नाहीये ऑफिसमध्ये!!" याची आठवण झाली. तुम्हाला पण अशा कितीतरी गोष्टी आठवतील. 

      " आगळा दुरावा" ही आगळीवेगळी कथा आहे घटस्फोटित जोडप्याची!! त्या दोघांनी अगदी विचारपूर्वक घटस्फ़ोट घेतलेला आहे,  तरीही त्यांचे संबंध अगदी अलवार जाणिवेच्या पातळीवर असून, कोणतीही कटुता नाही. तिला राजकारणात करियर करायची होती आणि याला सैद्धांतिक गैरव्यवहार करणे मान्य नव्हते म्हणून घटस्फ़ोट घेतलेला होता. आजही एकमेकांची मतं आणि मनं जपणारे, एकमेकांना आपलं यशापयश मनापासून सांगणारे,  एकमेकांच्या कुटुंबाशीही छान संबंध ठेवणारे,  असे आगळेच नवराबायको आहेत यात. मला ही कथा अतिशय आवडली. खरंच माणसाने इतकं डोळस व्हायला शिकलं पाहिजे. 

         याव्यतिरिक्त इतरही लेख/ कथा अप्रतिम आहेत, यात जावं उजवं करणं कठीण आहे. पण लताच्या गाण्यात सुद्धा आपण अति आवडीची गाणी निवडतोच ना, तसे हे लेख मी निवडले.

        माझं लिखाण हा ट्रेलर माना आणि तुम्ही स्वतः सरांची पुस्तकं नक्की वाचा. 

       इतरही पुस्तकं वाचली आहेत, त्याविषयी लिहीतेय नक्कीच.

सुवर्णा भावे जोशी
चिपळूण .
११ एप्रिल २0२0